मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांचा जावई पकडला गेला त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्याच्या वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्यांमधून वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे, अशी टीका आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली.
राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने शनिवारी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यामध्ये जयंत पटेल, रमेश थोरात यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा “फोकस” का नाही वळला असा सवाल करीत आशिष शेलार यांनी राज्य शासनाने या चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी केली आहे.
शेलार म्हणाले की, राज्यात सुमारे १० हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करुन आपली कला सादर करतात. तसेच त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना काळात गेल्या दिड वर्षांत प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंतांचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज होती. कर्नाटक, चंदिगड सारख्या राज्यांनी आपापल्या राज्यातील कलावंतांना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत पण या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही याची आठवण करुन देण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली, असे शेलार म्हणाले.
(PRAHAAR)