मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते आठवी, तसेच शहरी भागात आठवी ते बारावी इयत्तांचे वर्ग सुरू होतील, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्या संदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू असताना आता शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५वी ते ८वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील ८वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू असताना आता शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे.
(PRAHAAR)