कोलकाता (वृत्तसंस्था) : एककीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून काही महत्त्वाचे आमदार आणि बडे नेते भाजपामध्ये गेले असताना असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे ओवेसी यांना भाजपाने पैसे देऊन निवडणूक लढण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मुस्लीम मतांसाठी हे राजकारण केले जात असल्याचा आरोप ममता यांनी केला. भाजपा आणि एमआयएमची ही छुपी युती असल्याचा आरोप होत असताना भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री शाहनवाझ हुसेन यांनी मात्र एमआयएमवर टीका केली आहे.
एमआयएम हा रझाकारांचा पक्ष आहे. हे केवळ मुस्लीम लोकांचाच विचार करतात, असा आरोप भाजपा नेते शहनवाज हुसैन यांनी केला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील चर्चासत्राच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी यांनी वारिस पठाण यांना हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरून राजकारण न करण्याची शपथ घ्या असे आवाहन केले. या विषयावर बोलताना शाहनवाझ हुसेन यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातदेखील हे लोक राजकारण करण्यात व्यस्त होते. १५ मिनिटे पोलीस हटवा, आम्ही हिंदूंना बघून घेऊ अशी वक्तव्य करणारे लोक कायमच धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत असून हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणे हेच या लोकांचे राजकारण असल्याचा आरोपही हुसेन यांनी वारिस पठाण यांच्यावर सडकून टीका केली.
दरम्यान, याआधी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना उत्तर देताना वारिस पठाण यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडली. आम्ही जर विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली तर त्यात चूक काय? आम्ही केलेली विकासकामे आम्ही जनतेसमोर ठेवू. जनतेला एक सक्षम पर्याय मिळत असेल तर त्यात गैर काय? जर आम्ही निवडणूक लढवावी असे बंगालमधील लोकांनाच वाटत असेल, तर त्यात काही चुकीचे नाही, असे वारिस पठाण म्हणाले.
(PRAHAAR)