मनोज जोशी
सोशल मीडिया. हा विषय असा आहे की, यावर जितकं बोलावं तितकं कमीच. अनेकदा उपदेशाचे डोस पाजताना अनेक मुद्यांची पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे कधी-कधी हा विषय नकोसा होतो. आताही अनेकांच्या मनात हाच विचार येईल की, आता नवीन काय ऐकायला मिळतंय? की, पुन्हा ‘तेच ते नि तेच ते..’
सोशल मीडियावर पटकन कोणत्याही विषयावर व्यक्त होता येते. गंमत म्हणजे, दिवसातून एकदा फेसबुक किंवा ट्विटर पाहिल्यानंतर काही जण या फेसबुक अन् ट्विटरवरून हटत नसल्याचेच लक्षात येते. व्हॉट्सअॅपचं देखील तसंच आहे. व्हॉट्सअॅपवर फिरणारी एक पोस्ट त्याला एकदम ‘फिट’ बसते. लहान बाळानं शी-शू केली आहे का, हे पाहण्यासाठी जसा त्याचा लंगोट वारंवार तपासला जातो, तसंच व्हॉट्सअॅपचं आहे.
पण, या सोशल मीडियाने अनेकांना एकत्र आणलं आहे, यात कुणाचंही दुमत नाही. त्यात ओळखीच्या व्यक्तींबरोबरच अनोळखी देखील असतात. कधी-कधी एखादा जुना मित्र-सवंगडीसुद्धा या सोशल मीडियावर सापडतो. त्यावेळी मिळणारा आनंद हा अलिबाबाला सापडलेल्या खजिन्याच्या आनंदापेक्षा तसूभरही कमी नसतो. मग त्याचा नंबर मिळवणं.. त्याच्याशी संवाद साधणं.. हे ओघानं आलंच.
मग हळूहळू शालेय मित्रांचे, वर्गमित्रांचे व्हॉट्सअॅप ग्रुप बनतात. री-युनियन हा शब्द वास्तवात उतरतो. मग ते स्नेहसंमेलन किंवा अशाच कोणत्या तरी कारणाने एकमेकांना भेटणं सुरू होतं. दररोजच्या धबडग्यात दिवस कुठे उगवला आणि कुठे मावळला, ते कळतच नाही. पण, आठवणींची फुले मात्र कायम ताजीच राहतात. व्हॉट्सअॅप उघडल्या-उघडल्याच त्याचा दरवळ जाणवतो. अगदी ‘गुड मॉर्निग’ मेसेजपासूनच मित्र-मैत्रिणींची भेट होते.
काही जण फक्त सोशल मीडियाच्या ‘कट्टय़ा’वरच भेटतात.. पण, तेवढीही भेट पुरेशी ठरते. कारण, ते नुसते ‘गुड मॉर्निग’ मेसेज नसतात, तर ती दिवसाची आल्हाददायक सुरुवात असते. हे मेसेज वाचता-वाचता ‘एकदम सही’ असं म्हणून जातो आणि हाच तो सूर असतो.. ती पट्टी असते.. जो दिवसभराचा ‘मूड’ तयार करतो.
प्रत्येक जण अशा आठवणी घेऊनच जगत असतो. समोरच्याची भेट सहजपणे होत नसेल, तर त्यातील गोडवा-आनंद आणखी वाढत जातो. वरचेवर भेट होत राहिली, तर कदाचित ‘अति परिचयात् अवज्ञा..’ होऊ शकते. त्यामुळे आठवणी जपणंच फार महत्त्वाचं ठरतं.
आपण एखाद्याला खूप महिन्यांनी वा वर्षभरानंतर फोन केल्यानंतर ‘काय खूप दिवसांनी आठवण काढली?’, असं सर्रास विचारलं जातं. आपणही एखाद्याला असंच विचारतो. पण, माझ्या मते असं विचारणं चुकीचं आहे. आठवण आहेच, म्हणून तर हक्काने फोन करतो किंवा आपल्याला फोन केला जातो. आपली आठवण आहे, याची ती ‘खात्री’ असते. यासाठी दर दोन दिवसांनी किंवा वारंवार फोन करण्याची गरज नसते.
कधी-कधी दुस-या पद्धतीनं असंच काहीसं घडतं. आपलं एखादं काम अडलेलं असतं. नंतर काहीना काही तरी, ‘जुगाड’ करून ते पूर्ण करतो किंवा तसंच सोडून देतो. नंतर एखाद्या दिवशी अचानक एक मित्र भेटतो. गप्पांच्या ओघात त्या कामाचा आणि त्यासाठी लागलेल्या मेहनतीचा विषय निघतो; तो मित्र सांगतो ‘अरे, मला सांगायचं ना! आपला तो अमूक अमूक तो तिथं आहे ना, त्यानं दोन मिनिटांत हे काम केलं असतं.’ हे लक्षात आल्यावर आपणही ‘रिअॅक्ट’ होतो, ‘हो रे, हे माझ्या लक्षातच आलं नाही.’ अशा प्रसंगात ‘मित्राची आठवण’ होतच नाही. हेच खरं म्हणजे, ‘विसरणं’ ठरतं आणि आपण ते गांभीर्यानं घेत नाही. कारण, आपण केवळ सोशल मीडियावर मेसेज करण्यात गुंतलेले असतो, अन् संवाद खुंटलेला असतो..!
(PRAHAAR)