सोनं आणि चांदी यांच्या दरातली उच्चांकी वाढ आणि आगामी काळातले सणासुदीचे दिवस पाहता गुंतवणुकीचा नवा पर्याय पुढे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या खरेदीचा विचार करता सोनं तसंच चांदीमधली गुंतवणूक आकर्षक आणि मोठे परतावे देणारी ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातही चांदीतली गुंतवणूक अधिक लाभदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोनं हा सोनेरी धातू म्हणून पहिल्यापासूनच आकर्षक ठरला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या भावातही घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणा-यांना शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच मोठे परतावे मिळत आहेत. यात चांदीही मागे नाही. चांदीच्या भावात गेल्या एका महिन्यात किलोमागे तब्बल नऊ हजार रुपये वाढ झाली आहे. तसंच चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शेअर बाजारातल्या मंदीमुळे मेटाकुटीला आलेल्या गुंतवणूकदारांना सोन्या-चांदीनं अशा प्रकारे हात दिला आहे. अर्थात यासाठीच पोर्टफोलिओतल्या वैविध्यावर नेहमीच भर दिला जातो. सोन्यातली गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते; परंतु सध्या चांदीच्या भावातही चांगलीच वाढ होत आहे. गुंतवणूकदार शेअर बाजारातल्या पडझडीला घाबरून या धातूंमध्ये करत असलेली गुंतवणूक याला कारणीभूत आहे. यालाच बाजाराच्या भाषेत फिअर ट्रेड असं म्हटलं जातं. याचा अर्थ गुंतवणुकीसाठी कोणताही सुरक्षित पर्याय उरला नाही की गुंतवणूकदार असा एखादा सुरक्षित पर्याय निवडतात. सध्या सोन्या-चांदीच्या बाबतीत हेच घडत आहे. सोन्याचा भाव सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलाच वधारला आहे. गेल्या सहा वर्षामधला हा उच्चांकी भाव आहे.
मंदीमुळे रिअल इस्टेटमधील व्यवहार थंडावले आहेत. शेअर बाजारातली गुंतवणूक काढून घेण्याचं प्रमाण काही अंशी वाढलं आहे. शिवाय म्युच्युअल फंडांकडेही नवीन गुंतवणूकदार पाठ फिरवत असून आधीचे गुंतवणूकदार काळजीपूर्वक पावलं टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी वाढत असून सोन्याचा भाव दिवाळीपर्यंत विक्रमी पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करत आहेत. सोन्यातल्या गुंतवणुकीनं आताच २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. २०१८ मध्ये सोन्यानं सहा टक्के परतावा दिला होता. मात्र ३१ डिसेंबरला प्रति दहा ग्रम ३२,२७० रुपये असलेला सोन्याचा भाव आता ३९ हजार रुपयांवर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेतली सुस्ती आणि अमेरिका-चीन यांच्यातलं व्यापारयुद्ध आणि केंद्रीय अर्थसंकल्पानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातली गुंतवणूक काढून घेतल्यामुळे झालेलं रुपयाचं अवमूल्यन यामुळे सोन्याची स्थिती आणखी मजबूत बनत चालली आहे. याखेरीज इतर देशांची चलनंही डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत चालले आहेत. सोन्याच्या दरात होणा-या वाढीमागे सरकारने २.५ टक्क्यांनी वाढवलेलं आयात शुल्क कारणीभूत आहे. त्यामुळे आयात शुल्क १२.५ टक्के झालं आहे. परिणामी, आयातीत घट झाली आहे. भारताला १.३७ अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी वाचवण्यात यश आलं आहे. मात्र त्यामुळे सोन्याचा दर चांगलाच वधारला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ११.४७ टन सोन्याची आयात झाली होती. यंदाच्या ऑगस्टमध्ये ३० टन सोन्याची आयात झाली.
गुंतवणूकदार चांदीकडेही मोठय़ा प्रमाणात वळले आहेत. चांदीचा हा गेल्या तीन वर्षामधला उच्चांकी दर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा दर सहा वर्षापूर्वी २३ डॉलर प्रति औंस होता. चांदी-सोन्याच्या गुणोत्तराचा अभ्यास करून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार चांदीचा हा दर सुमारे ६१ हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यात काही अंशी घट झाली असं गृहीत धरलं तरी हा भाव ५८ हजारांपर्यंत जाईल, असं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षभरातच चांदीचा दर ३९ हजार रुपये किलोवरून सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीतली तेजी गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं काही अंशी अनपेक्षित असली तरीही हा सोन्यानंतरचा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. परदेशात चांदीचे एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ईटीएफ आहेत. त्यातही शेअर सिल्व्हर ट्रस्ट आणि ग्लोबल सिल्व्हर ईटीएफ यांचे सिंगापूर आणि अमेरिकेतल्या बाजारांमध्ये व्यवहार होतात. त्यांची तरलताही चांगली आहे. हे दोन्ही ईटीएफ २०१० पासून कार्यरत आहेत. त्यांचं एनएव्ही किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य २२ टक्क्यांनी वाढलं आहे. आर्थिक अस्थैर्याचा विचार करता चांदीतली गुंतवणूक वाढेल आणि चांदीची किंमतही चांगलीच वधारेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
चांदीचा वापर नेहमीच औद्योगिक कारणांसाठी होतो; परंतु औद्यागिक मंदीमुळे चांदीची मागणी घटल्यानं तिचं उत्पादन कमी झालं. सोनं, तांबे, जस्त यांसारख्या धातूंच्या शुद्धीकरण प्रक्रियेत चांदी हे उपउत्पादन असतं, हे यामागचं कारण आहे. आता मात्र गुंतवणुकीसाठी मागणी वाढल्यानं चांदीचे भाव आणखी वाढणार आहेत. गेल्या वर्षी चांदीची गुंतवणूक मागणी १८ कोटी औंस एवढी होती. यंदा ती आताच २१ कोटी २० लाख औंस एवढी झाली आहे. चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज गुंतवणूकदार वर्तवत आहेत, त्यामागे आणखी एक निकषही आहे. तो आहे चांदी-सोन्यामधलं गुणोत्तर. हे गुणोत्तर अर्थातच सातत्यानं बदलत राहतं. २०११ मध्ये सोन्याचे भाव अचानक वाढले. त्यावेळी सोन्याचा भाव १६०० डॉलर प्रती औंस इतका होता, तर चांदीचा भाव ५० डॉलर प्रति औंस होता. याचा अर्थ सोन्याचा भाव चांदीच्या भावाच्या सुमारे ३२ पट होता. चांदीच्या भावात अलीकडेच घसरण झाली होती. त्यावेळी हा भाव १४ डॉलर प्रती औंसापर्यंत खाली आला होता. पण त्यावेळी सोनं १३०० डॉलर प्रति औंस दरानं विकलं जात होतं. याचा अर्थ त्यावेळी ते चांदीच्या तुलनेत ९० पट अधिक दरानं विकलं जात होतं. मात्र गेल्या महिन्यातल्या गुणोत्तराचा विचार केला तर सोनं चांदीच्या तुलनेत ९३ पटींनी विकलं जात आहे. चांदीच्या दरात तेजी आल्यानंतर हे प्रमाण ८१ पटीपर्यंत घसरलं आहे.
जाणकारांच्या मते चांदी आता ५० डॉलपर्यंत वधारू शकेल आणि तिच्या भावात सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकेल. सोनं-चांदीचं गुणोत्तर ६६ पर्यंत खाली येऊ शकेल. याचाच अर्थ अजूनही सोनं आणि चांदी यातली गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगलाच हात देणारी ठरू शकेल. २०१८च्या तुलनेत गुंतवणुकीसाठी चांदीची मागणी तीन कोटी औंस एवढी अधिक असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. साहजिकच गुंतवणुकीसाठी चांदीची मागणी वाढली की किंमतही वाढेल. आता प्रश्न येतो तो असा की, सोनं आणि चांदी यापैकी कोणत्या धातूमधली गुंतवणूक अधिक लाभदायक ठरेल? याचं उत्तर असं दिलं जात आहे की, सोन्यानं सहा वर्षामधला उच्चांकी भाव मिळवला असला तरी चांदीनं तीन वर्षामध्येच उच्चांकी भाव मिळवला आहे. याबरोबरच सोनं-चांदीच्या किमतीचं गुणोत्तर पाहिलं तरी चांदीतली गुंतवणूक अधिक लाभदायक ठरू शकेल, असं दिसतं. (PRAHAAR)