साहित्य संमेलन आयोजकांवर नागपूरवरून दबाव? : असीम सरोदे
मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजीत उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केल्याने यावरून चांगलाच वादंग सुरू आहे. आमचा नयनतारा सहगल यांना विरोध नसल्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. दूसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल असीम सरोदे यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून आयोजकांवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘मनसेचे नाव पुढे करून कुणाच्या सांगण्यावरून नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले? कुणाच्या गैरसोयीचे त्या बोलणार होत्या? आयोजकांवर नागपूरवरून दबाव आला का? यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात, कट्टरवादी विचारसरणीचा हस्तक्षेप आहे का?’ अशी पोस्ट सरोदे यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहीली आहे. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्याने यावर चौफेर टीका होत आहे. संमेलनाला येणारया मान्यवरांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेत बहिष्कार टाकला आहे. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नसून त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, असे राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे म्हटले आहे. यवतमाळमध्ये ११ जानेवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यीकाच्या हस्ते का? असा सवाल मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला होता. उद्घाटन मराठी साहित्यीकाच्या हस्ते व्हावे अन्यथा संमेलन होऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला. यानंतर आयोजकांनी सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केले. एखाद्या राजकीय पक्षाला किंवा सामाजिक संघटनांना घाबरत आयोजकांनी एवढा मोठा निर्णय घेतला कसा? असा सवाल सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. (PRAHAAR)