नवी दिल्ली (वृत्तसंस्था): विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या रागाचे किस्से फारच कमी आहेत. मात्र १९९७ मधील वेस्ट इंडिज दौ-यात त्याचा राग अनावर झाला आणि त्याने संघ सहकारी सौरव गांगुली कारकिर्द संपवण्याची धमकी दिली होती. क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी हा किस्सा सांगितला आहे.
१९९७ मधील वेस्ट इंडिज दौ-यात कर्णधार सचिन आणि सौरव यांच्यात एक वाद झाला होता. बार्बेडोस कसोटीत भारताला वेस्ट इंडिजकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. विजयासाठी १२० धावसंख्येचा पाठलाग करताना तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारताचा दुसरा डाव अवघ्या ८१ धावांत संपला. ३८ धावांनी भारताने हा सामना गमावला. या पराभवामुळे सचिनला चांगलाच धक्का बसला होता. हातात आलेला सामना, भारताने गमावला होता. यावेळी सौरव गांगुली कर्णधाराला धीर देण्यासाठी गेला असता त्याला सचिनच्या रागाचा सामना करावा लागला.
सचिनने त्यावेळी सर्व खेळाडूंना ड्रेसिंगरूममध्ये उपदेशाचे धडे दिले. यावेळी त्याला स्वत:च्या क्षमतेवरही शंका येत होती. यावेळी सौरव सचिनला धीर द्यायला गेला असतान सचिनने त्याला उद्यापासून सकाळी माझ्यासोबत धावायला यावे लागेल. तयार राहा, असे बजावले. मात्र गांगुली सचिनसोबत धावायला गेलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या सचिनने गांगुलीला, ‘असा हलगर्जीपणा चालणार नाही. तुझी बॅग घेऊन घरी पाठवेन आणि कारकिर्द संपवेन,’अशी धमकी दिली होती.
सचिनच्या रागाचे गांगुलीने कधीही वाईट वाटून घेतले नाही. यानंतरही सचिन आणि गांगुली या जोडीने भारताला अनेक सामने जिंकवून दिले. या जोडीच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. तेंडुलकर आणि गांगुली ही भारताची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी होती. नव्वदीच्या दशकात सचिन सौरवसह द्रविड आणि लक्ष्मण सर्वात प्रसिद्ध चौकडी होती. २००८मध्ये गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर सचिनने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
(PRAHAAR)