उस्मानाबाद : एका शेतक-याच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह ५२ जणांवर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कटकारस्थान करून शेतक-याची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल खा. ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत १२ एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहे. सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पहायला मिळतील, असे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे आणखी एका पत्रात त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. साक्षीदारांसमक्ष पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आणि मयत शेतक-याने लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविली होती. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर खा. राजेनिंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, तेरणा कारखान्याच्या अध्यक्ष आनंदीदेवी राजेनिंबाळकर, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशा एकूण ५२ जणांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात फसवणूक व शेतक-याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा नोंद झाल्यामुळे शिवसेनेला मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
(PRAHAAR)