नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईमधील सर्वसामान्य व गरजू विद्यार्थी जुनी पुस्तके घेऊन अभ्यास करतात. त्यातील प्रज्ञावंत विद्यार्थी तर नववीची परीक्षा संपल्यानंतर तत्काळ माध्यमिक व उच्चमाध्यमिक वर्गाचे अध्यायन करण्यास सुरुवात करतात; परंतु यावर्षी दहावी व बारावीच्या मूल्यांकन परीक्षेविषयी अजून शासन स्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे कोणताही विद्यार्थी आपली पुस्तके विकत नाही. आता तर दहावीची माध्यमिक शाळा, बारावीची उच्च माध्यमिक महाविद्यालये ऑनलाइन सुरू झाली. पण पुस्तके मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव सुरू झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
कोरोना महामारीमुळे २०२०/२१ या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागात शिक्षण घेत असलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे शालेय मूल्यांकन करून गुणपत्रिका देण्याचे ठरले; परंतु त्यानंतर दहावी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १०० गुणांची मूल्यांकन परीक्षा घेण्याचे ठरले. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यातच उच्चमाध्यमिक विभागातील बारावीची परीक्षा देखील नुकतीच रद्द केली गेली. त्यावर बारावीच्या विद्यार्थ्यांना वार्गोन्नती कशी द्यायची? हा प्रश्न आजही अधांतरिच आहे.
नवी मुंबईमधील शेकडो गरजू विद्यार्थी जुनी पुस्तके घेऊन आपला अभ्यास सुरू करतात; परंतु गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्यानंतर दहावीसाठी जाहीर केलेले मूल्यांकन परीक्षेबाबत पुढील निर्णय जाहीर केला नाही. तसेच बारावीबाबत काय करायचे? हे गुलदस्त्यात असल्याने विद्यार्थी पुस्तके विकतही नाहीत व कोणाला देतही नाहीत. तर दुसरीकडे बालभारतीकडून पुस्तके वितरित केली गेली नाहीत. यामुळे बाजारपेठत पुस्तके उपलब्ध नाहीत. यामुळे हुशार मुलांची गोची झाली आहे.
पुस्तके बाजारात नसली तरी ऑनलाइन पुस्तके वाचण्यास मिळू शकतात; परंतु सगळ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाइन वर्ग व पुस्तके पाहण्यास प्रतिबंध येत आहे.
(PRAHAAR)