मुंबई : राज्य सरकारी कर्मचा-यांना नुकताच राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे तो पाच दिवसांचा आठवडा करत. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर आता असाच दिलासा लवकरच राज्यातील शिक्षकांना-विद्यार्थ्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. कारण, राज्यातील शाळांसाठीही पाच दिवसांचा आठवडा करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच शिक्षण आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नावर लढणा-या मुंबई ग्रॅज्युएट महासंघाला दिले आहे.
राज्य सरकारच्या धर्तीवर राज्यातील शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. त्यानुसार महासंघाचे अध्यक्ष राजू बंडगर आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. या भेटीत शिक्षणमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मकता दर्शवत यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. पाच दिवसांचा आठवडा लागू केल्याने शाळांची वीज-पाण्याची बचत होईल.
याशिवाय विद्यार्थ्यांचाही मानसिक ताण दूर होऊन आठवडय़ातील उर्वरित दोन दिवस इतर छंद जोपासणे शक्य होईल, असे यावेळी महासंघाकडून सांगण्यात आले. यावेळी महासंघाचे सल्लागार जगन्नाथ जाधव यांच्यासह पदाधिकारी सोपान मोरे, अर्चना नाटळकर, महेश खाडे, वीरेंद्र नेवरेकर, उमेश जागडे, संदीप खेडकर आणि कल्पेश राणे आदी उपस्थित होते.
(PRAHAAR)