मुंबई : सत्तेत असताना कायद्यात बदल करून बारामतीकडे वळवलेले दुष्काळी भागाचे नीरा देवघरचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला वळवण्यात येणार आहे. भाजप सरकारने या संदर्भातील अध्यादेश काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा दणका दिला आहे. बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
हा आदेश निघाल्याने सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती, इंदापूर तालुक्याला जाणारे नियमबाह्य पाणी कायमस्वरूपी बंद होऊन फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे बारामती भागातील शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार असे वक्तव्य केले होते. अखेर नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे महाजन यांनी आदेश काढले आहेत. शरद पवार यांनी यापूर्वीच यावर नाराजी व्यक्त केली होती. आता ते कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
()