नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या संसदीय दलाची एक बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अधिवेशनातील कामकाजात अडथळा आणत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला. ‘काँग्रेस पक्षाला ना चर्चेत रस आहे, ना संसदेचे कामकाज चालू देत आहे’, अशा शब्दांत मोदींनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस सभागृहाचे कामकाज चालू देत नाही, तसेच लसीकरणासंदर्भात सर्वपक्षीय दलाच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीलाही काँग्रेस सहभागी झाली नाही. १५ ऑगस्टनंतर या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवा, असे स्पष्ट निर्देशच पंतप्रधान मोदी यांनी खासदारांशी बोलताना दिले. विरोधी पक्ष सदनाचे कामकाज होऊ देत नाहीत. विरोधकांची ही मानसिकता जनतेसमोर आणणे गरजेचे आहे, असे या बैठकीत मोदींनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीसाठी एक रोडमॅपही पंतप्रधानांनी यावेळी खासदारांसमोर सादर केला. दुसरीकडे, विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. ‘लोकसभा आणि राज्यसभेच्या जागा वाढवण्यावर सरकारकडून गंभीरतेने विचार सुरू आहे का? हे सरकारने स्पष्ट करायला हवे. ज्या खासदारांसाठी संसद भवन बनवले जात आहे, त्यांनाही त्याची रूपरेषा काय असेल हे माहीत नाही’, असे म्हणत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी भाजपच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज्यसभेत घोषणाबाजी
दरम्यान, आज पुन्हा एकदा संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कृषी कायदे तसेच पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सदनाचे कामकाज तीन वेळा स्थगित करण्यात आले, तर दुसरीकडे, ‘विरोधी पक्षनेते सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत. पंतप्रधानांविरुद्ध अशोभनीय भाषेत टिप्पणी केली जात आहे. मास्कशिवाय घोषणाबाजी केली जात आहे, हे कोरोना नियमांचे उल्लंघन आहे’, अशी टीका मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली.
७०१ कोटीची मदत मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटीची मदत मंजूर केली आहे. ही मदत मागच्या वर्षी आलेल्या पुरात ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे.