भंडारा : सततच्या पावसामुळे मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा, बाघ नदीला पूर आला आहे. यामुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आतंरराज्यीय पुलावर पाच फूट पाणी असल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संपर्कही तुटला आहे.
कारधा येथील पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरुन बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. जिल्हाधिका-यांनी पुरस्थितीची पाहणी केली असून वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. करचखेडा-सुरेवाडा, सिहोरा-बपेरा, तामसवाडी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर भंडारा येथील स्मशानभूमी मार्गावर पाणी असल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंतरराज्यीय पुलावर ५ फुट पाणी असल्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला असून शेकडो प्रवासी सिमावर्ती गावात अडकले आहेत. पुराचे पाणी देवरी गावाचे शिवारात शिरल्याने १०० एकरहून अधिक क्षेत्रातील धानाचे पिक गेल्या ४८ तासापासून पाण्याखाली आहेत. गोंडीटोला, सुकडी नकुल, बपेरा, चुल्हाड, परसवाडा या नद्यांच्या काठावरील गावात हीच स्थिती आहे. बावनथडी नदीचे पाणी संगमनजिक अडल्याने नदीला पूर आला आहे. याच नदीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याला जोडणारा पूल आहे. या पुलावर ५ फुट पाणी आले आल्याने संपूर्ण वाहतूक बंद आहे.
कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील बहुतांश भागांतही पूरस्थिती कायम आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढते आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
(PRAHAAR)