नवी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला केंद्रीय पथकाने भेट दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ११ ते १७ मे पर्यंत मार्केट बंद असून सुरक्षेसाठीच्या उपाययोजना करून सोमवारपासून मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.
नवी मुंबईत साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण एपीएमसीशी संबंधित आहेत. ११ मे पासून एक आठवडा येथील पाचही मार्केट बंद आहेत. या कालावधीत पालिकेच्या दहा पथकांमार्फत आरोग्य तपासणी सुरू आहे. पाचही बाजारपेठांचे विशेष निर्जंतुकीकरण केले जात आहे.
मार्केट सोमवारपासून सुरू करण्यासाठी कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोकण आयुक्त शिवाजी दौंड, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस आयुक्त संजय कुमार व एपीएमसी अधिकाऱ्यांची बैठक होणार असून यावेळी मार्केट सुरू करण्यासाठी सुधारित नियमावली निश्चित केली जाणार आहे.
(PRAHAAR)