नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांना कार्यकाल संपेपर्यंत निलंबित राहावे लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे आणि कागदांची फेकाफेक करणे या कारणांसाठी या दहा खासदारांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेगॅसस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि कृषी कायद्यांविरोधात संसदेत विरोधकांनी बुधवारी गदारोळ घातला. लोकसभेत विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली आणि ‘खेला होबे’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी १२.३० पर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू होताच पुन्हा विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे पुन्हा ३ वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतर पुन्हा गदारोळ झाल्याने ४ वाजेपर्यंत तहकूब केलं गेलं. यानंतर कामकाज सुरू होताच गदारोळ सुरूच राहिला. यामुळे उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले. लोकसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी या १० खासदारांचे निलंबन झाले आहे. हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर येऊन त्यांच्यावर कागद फेकत होते.
या १० निलंबित खासदारांमध्ये मणिकम टागोर, दिन कुरिकोसे, हेबी एडन, एस. ज्योतिमणी, रौनित बिट्टू, गुरजित औजला, टीएन प्रथपन, व्ही. वैथिलिंगम, सप्तगिरी शंकर, दीपक बाज यांचा समावेश आहे. या निलंबनानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या खासदारांनी लोकशाहीचा अपमान केला असून त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप भाजपने केला. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
लोकसभा अध्यक्षांचा इशारालोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे एखादा खासदार जर दुसऱ्यांदा गोंधळ घालताना दिसला, तर त्याला पूर्ण टर्मसाठी निलंबित करण्यात यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राहुल गांधींची टीका
लोकसभा आणि राज्यसभेत देशासाठी महत्त्वाच्या विषयांवर बोलूच दिले जात नसेल, तर विरोधक घोषणाबाजी करणारच, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पेगॅसस प्रकरणी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे, एवढीच आमची मागणी आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणे हे विरोधी पक्षांचे कर्तव्यच आहे, असेही ते म्हणाले.
(PRAHAAR)