सिंधुदुर्ग : ‘कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी ७० ते ८० टक्के मते भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांना मिळतील. अन्य सगळ्या उमेदवारांना मिळून २० ते ३० टक्के मते मिळतील, हे माझे भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कणकवली येथे व्यक्त केला.
नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांना शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, सावंत हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधात बोलणार का, याविषयी उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जाहीर टीका न करता आपल्या उमेदवाराचा दणदणीत विजय होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
कणकवलीत ज्या पद्धतीने भाजप आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते सगळे एकत्र आलेत. ते पाहता विचलित होण्याची अजिबात गरज नाही. आपला विजय निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला वेगळे काही करण्याची गरज नाही. अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडे दुर्लक्ष करा. प्रेमाने आणि शांततेने लढा. जिंकणा-या लोकांनी वाघासारखे राहायचे असते,’ असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. भाजप सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या विकासकामांचा आढावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नारायण राणे यांच्या कार्यपद्धतीचे आणि दूरदृष्टीचे कौतुक केले. ‘मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. राणे यांच्याकडून आम्हाला भविष्यातही त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल,’ असे ते म्हणाले. ‘नीतेश हे सुद्धा त्यांच्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर आता त्यांना थोडा संयम बाळगावा लागेल,’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
(PRAHAAR)