मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील अनेक भागांत हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यातून लोक अद्याप सावरू शकलेले नाहीत. त्यातच पाऊस आणि पुरामुळे त्रस्त झालेल्या रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट असल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांत ३० जुलैपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला जात होता; परंतु परिस्थिती अतिवृष्टीच्याही पलीकडे गेली आणि पूरस्थितीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आज थोड्या वेळासाठी थांबलेल्या पावसामुळे विस्कटलेले जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. आता पुन्हा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज आणि उद्या २८ जुलै रोजी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. २९ आणि ३० जुलैला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे ‘ऑरेंज अॅलर्ट’ तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
(PRAHAAR)