X Close
X
9819022904

यंदाच्या दिवाळी खरेदीने मोडले विक्रम


Diwali-2E3E4E407112018104758

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने देशाचे अर्थचक्र मंदावले. सर्वाधिक फटका लहान व्यावसायिकांना झाला. मात्र, यंदाची दिवाळी व्यावसायिकांचे आर्थिक गणित उजळवणारी ठरली. यंदाच्या दिवाळीत झालेल्या खरेदीने व्यवसायाचे मागील १० वर्षांमधील विक्रम मोडले आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.

दिवाळीत नागरिकांना दिलखुलासपणे बाजारात खरेदी केली. यामुळे छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. दिवाळीत दरवर्षी होणाऱ्या खरेदीचा मागील १० वर्षांचा विक्रम यंदा मोडला. या प्रतिसादामुळे भविष्यातही बाजारात चांगली मागणी होऊन बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. व्यापारी संघटना द कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) याबाबत आकडेवारी जारी करत ही माहिती दिली.

कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बाजारपेठा ओस पडल्या होत्या. मात्र, दिवाळीने हे चित्र पालटून टाकले. दिवाळीत नागरिक उत्साहाने खरेदीसाठी बाहेर पडले. यामुळे अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्यास मदत झाली. सीएआयटीने याआधी दिवाळीत १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज लावला होता. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या प्रतिसादाने हा अंदाज मोडीत काढत नवा विक्रम केला.

व्यापारी संघटनांनी या वर्षअखेर जवळपास ३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये उत्साह आणि नाविन्य असल्याने हा आकडा गाठला जाईल, असे व्यापाऱ्यांना वाटत आहे. यामुळे मागील २ वर्षांमध्ये व्यावसायिकांचे झालेले नुकसान भरून येण्यास मदत होणार आहे.

(PRAHAAR)