मुंबई : दिल्लीत घडलेला हिंसाचार मुंबई सुद्धा घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली कंबर कसत मुंबईमध्ये ५ पेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास मनाई केलेली आहे. ही जमावबंदी ९ मार्च, २०२० पर्यंत राहणार असून या दरम्यान मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
दिल्लीतील हिंसाचारादरम्यान जाळपोळ मारहाण दगडफेक करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला होता. त्यापेक्षाही मोठा हिंसाचार मुंबईत घडवला जाऊ शकतो, अशी सूचना गुप्तचर विभागाने दिली आहे. शिवाय मुंबईत सध्या अधिवेशन सुरू असून त्याच सीएए व एनआरसीविरोधात अनेक आंदोलने केली जात असल्यामुळे यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे.
यातून चित्रपटगृहे, नाटय़गृहे, शासकीय कार्यालय यांना वगळण्यात आलेले आहे. याबरोबरच विवाह समारंभ व कौटुंबिक समारंभांना हे आदेश लागू नसणार असल्याचाही मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे. मुंबईतील विमानतळाजवळ कुठल्याही प्रकारचे ड्रोन, हलकी छोटी विमाने व लेझर लाईट चालवण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
(PRAHAAR)