मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश आले असतानाच आता पावसाळी आजार डोके वर काढत आहे. जानेवारी ते ११ जुलै या काळात मलेरियाचे १ हजार ९९१, गॅस्ट्रो १ हजार ३८४, तर डेंग्यूच्या ५७ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या आजारांमध्ये एकाचाही मृत्यू झाला नसला तरी पावसाळी आजारांमुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची पहिली लाट धडकली, तर यंदा फेब्रुवारीच्या मध्यावर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेसमोरील आव्हान गंभीर झाले होते. दुसऱ्या लाटेत दहा हजारांपार गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता ६००पर्यंत खाली आहे. मात्र पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने पावसाळी आजार रोखण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. मेच्या अखेरपासूनच केईएम, नायर, शीव आणि कूपर या मुख्य रुग्णालयांसह १६ उपनगरी रुग्णालयांमध्ये दीड हजार बेड सज्ज ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बेडच्या नियोजनानुसार डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन व्यवस्था उभारण्यात आली आहे.
(PRAHAAR)