मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्रावर निशाणा साधल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मांडलेल्या एकेका मुद्यांची त्यांनी अक्षरश: चिरफाड केली आहे. केंद्र सरकारडून दिल्या जाणा-या मदतीवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार जुंपली आहे. फडणवीस यांनी केलेले दावे महाआघाडीच्या तीन मंत्र्यांनी खोडून काढल्यानंतर फडणवीस यांनीही तत्काळ पलटवार केला. राज्य सरकारच आभासी आकडे दाखवत आहे. फेकाफेक करून आणि खोटे बोलून राज्याचे भले होणार नाही. महाराष्ट्राचा मित्र कोण? आणि शत्रू कोण? हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून मिळालेल्या मदतीची जंत्रीच सादर केली होती. एवढी मदत करूनही राज्य सरकार काहीच करताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या तीन मंत्र्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या दाव्यांची चिरफाड केली होती. फडणवीसांनी आभासी आकडे दाखवण्याचा काल प्रयत्न केला. केंद्राकडे राज्याचा ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून हा निधी अद्यापही आम्हाला मिळालेला नाही, असा दावा महाआघाडीच्या नेत्यांनी केला होता.
फडणवीस यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, पीपीई किट्स मिळाले नाही म्हणून सांगतात, पण यासंदर्भातला डायनामिक डॅशबोर्ड आहे. त्या डॅशबोर्डवर पीपीई किट्स कुठल्या राज्याला देण्यात आले याबाबतची माहिती देण्यात आलेली असते. २६ मे पर्यंत महाराष्ट्राला ९ लाख ८८ हजार म्हणजे जवळजवळ १० लाख पीपीई किट्स दिल्या आहेत. तसेच १६ लाख एन ९५ मास्क दिले आहेत. ४६८ कोटी रुपये हे केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तम काम झालेले सांगत असलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही फडणवीसांनी खडे बोल सुनावले आहेत. मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. देशात टेस्ट केल्यानंतर एकूण पाच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघतात आणि महाराष्ट्रात ते १३ ते साडेतेरा टक्के पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. मे महिन्यात त्याचे प्रमाण ३२ टक्के आहे. मग कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटण्याचे काम ठाकरे सरकारच्या वतीने चालले आहे. हे मला खरोखरच समजत नाही, असे म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडले आहे.
केंद्राकडून पैसे मिळालेले असतानाही केंद्राकडून काही येत नाही असे सांगू नका. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण आलेले आहेत. डिसेंबर ते मार्चपर्यंतच्या पैशांचा निर्णय जीएसटी काऊन्सिल घेते आहे. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे. अशा प्रकारच्या एकत्रित पत्रकार परिषदा घेण्याऐवजी मुंबईत लोकांना अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे लोकांचा मृत्यू होतोय, त्यासंदर्भात तुम्ही काय करणार आहात ते सांगा, असे आव्हानच फडणवीसांनी सत्ताधा-यांना दिले आहे. मुंबईत लोकांचे टेस्टिंग होत नाही, यासंदर्भात काय करणार आहात ते सांगा. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी दिल्याने महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्टपणे माहीत आहे. सरकारला मदत करायची आजही आमची भूमिका आहे. पण अशाप्रकारे सरकारकडून फेकाफेक केली जात असेल, तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थान मिळाल्यास मला आनंदच, मी त्याचे स्वागत केलेले आहे. त्यासाठी तरुणांना ते कौशल्यही द्यावे लागेल. डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. तो जर निघून गेला तर महाराष्ट्रातील कुठल्या कामगाराला ते कौशल्य लगेच आत्मसाद करता येणार आहे. ते कौशल्य त्याला आधी शिकावे लागेल. देशातील ३३ टक्के रुग्ण ज्या राज्यात आहेत. देशातील ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात झालेले आहेत. त्या राज्याचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आम्ही कसे उत्तम काम करत आहोत हे सांगत असल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे.