मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये आता मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आस्मानी संकटामुळे चिंतेत आले आहेत. रविवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे.
मराठवाडा, विदर्भ, यवतमाळ, इंदापूर, चंद्रपूर, कोल्हापूर सोलापूर, येथे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. बोरांच्या आकाराच्या गारा काही भागांमध्ये पडल्या. त्यामुळे आंबा, द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत सोयाबीन,तुर आणि चना जो व्यापा-यांनी खरेदी करून खुल्या मैदानात ठेवला होता तो देखील भिजल्याने व्यापा-यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदील झाला आहे
इंदापूर तालुक्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले. तर इंदापूर तालुक्यातील काटी व बावडा भागात गारांसह मोठा पाऊस पडला. अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात रात्री आणि पहाटे विजांच्या कडकडासह पाऊस पडला. वणी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सोयाबीन, तूर आणि चना जो व्यापा-यांनी खरेदी करून खुल्या मैदानात ठेवला होता तो देखील भिजला आहे. या अवकाळी पावसाने व्यापा-यांचे नुकसान झाले आहे.
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनार पट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २१ एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
(PRAHAAR)