केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांविषयी आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांना मुलाखती देताना जे भाष्य केले आहे, त्यावरून त्यांची पातळी किती खाली गेली आहे, हेच महाराष्ट्रातील जनतेला दिसून आले. ज्यांना नारायण राणे यांच्या सार्वजनिक कामांची, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, त्यांच्या अफाट जनसंपर्काची माहिती नाही, त्यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये, पण जाधव यांना सांगणार कोण? चिपळूणची परंपरा, चिपळूणचे सांस्कृतिक वातावरण, चिपळूणचे निकोप वातावरण याचा जाधवांना विसर पडलेला दिसतो, म्हणूनच आपल्या पक्षप्रमुखांना व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी त्यांची जीभ घसरली असावी. कोकणात राहून नारायण राणे यांचा अनादर करणारी काही मोजकी डोकी आहेत, तेच त्यांचे राजकारणातील भांडवल आहे. त्याच जोरावर पक्षप्रमुखांकडून काही ना काही लाभ होईल, या आशेने ते राणे व त्यांच्या मुलांवर सदैव टीका करीत असतात. जाधवांनी राणे व त्यांच्या मुलांवर काय भाष्य केले, हे आम्ही पुन्हा लिहून आमची शाई वाया घालवणार नाही. पण ‘जित्याची खोड जात नाही,’ तशी जाधवांची प्रवृत्ती आहे. नारायण राणे यांचे जीवन संघर्षमय आहे. सतत संघर्ष करूनच ते मुख्यमंत्री झाले व मोदी-शहांचा विश्वास संपादन करून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचले. ते सत्याशी प्रतारणा कधीच करीत नाहीत, वास्तवाला कधी झाकून ठेवत नाहीत. एकदा निर्णय घेतला की, कधी माघार घेत नाहीत. पक्षहितासाठी व जनहितासाठी निर्णय घेताना आपले निवडणुकीत काय होईल, याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. शिवसेनाप्रमुख हे आपले दैवत होते, हे आजही ते अभिमानाने सांगतात. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पटले नाही आणि उद्धव यांना प्रभावशाली राणे नकोसे झाल्यामुळेच शिवसेना सोडून ते बाहेर पडले. त्याला सोळा वर्षे उलटून गेली. या काळात त्यांनी संघर्ष कधी सोडला नाही. नारायण राणेंच्या दोन्ही मुलांवर वडिलांचे संस्कार आहेत. वडिलांचा संघर्ष त्यांनी जवळून बघितला आहे आणि सुखदु:खाच्या काळात त्यांनी वडिलांना मनापासून जिद्दीने साथ दिली आहे. नारायण राणे व त्यांच्या मुलांचा स्वभाव फणसासारखा आहे. फणस जसा वरून काटेरी असतो व आतून गोड असतो, असे हे राणे कुटुंबीय आहे. पण कावीळ झालेल्या माणसाला सर्व जग पिवळे दिसते, तसे भास्कर जाधव यांचे झाले असावे.
ज्याचे पाय चिखलाने बरबटलेले आहेत, त्याने दुसऱ्यावर शिंतोडे उडवू नयेत, याचे तरी जाधव यांनी भान ठेवायला हवे. पण आपल्या फाटक्या तोंडाने हा माणून सदैव वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. कोकणावर अतिवृष्टी व पुराचे मोठे संकट कोसळल्यावर मीडियाने आवाज उठविल्यावर मुख्यमंत्र्यांना जाग आली. मुख्यमंत्री ड्रायव्हिंग करीत कोकणाकडे कधी निघणार, असा थेट प्रश्न भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारल्यावर मुख्यमंत्र्यांना वर्षा सोडून इच्छा असो वा नसो कोकणाकडे निघावे लागले. देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे दोन्ही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कोकणात पूरग्रस्त भागांत लगेचच धावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायण राणेंना कोकणात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी करून या, असे सांगितले. भाजपची सारी यंत्रणा कोकणात दिसू लागल्यावर मुख्यमंत्र्यांना तेथे जाणे गरजेचे वाटले असावे. आजही भाजप आणि संघ परिवाराचे नेते, पदाधिकारी व स्वयंसेवक कोकणात पूरग्रस्त भागांत मदत कार्यात गुंतले आहेत आणि आमदार जाधव मात्र राणे कुटुंबीयांवर कुत्सितपणे टीका करण्यात धन्यता मानत आहेत. मुख्यमंत्री चिपळूणला आले असताना व्यापारीवर्गाने त्यांच्यासमोर आक्रोश केला, तेव्हा पूरग्रस्तांचे दु:ख मांडणाऱ्या महिलेला भास्कर जाधव ज्या उद्धटपणे गप्प करू पाहत होते, हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. ‘तुझ्या आईला समजव,’ अशी हातवारे करणारी अरेरावीची भाषा जाधव वापरत होते. मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने जाधव यांचा उर्मटपणा चालू होता, पूरग्रस्तांचे सांत्वन करण्याची जाधव यांची पद्धत बघून कोकणवासीयांची मान खाली गेली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जाधव यांना तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्याची घटना त्यावेळी घडली. अधिवेशनात फार मोठी कामगिरी केली, असे कुणाला वाटत असेल, तर तो भ्रम आहे, हे जनताच दाखवून देईल. जाधव आज शिवसेनेत आहेत, पण तेच शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का गेले होते? राष्ट्रवादी काँग्रेसने व शरद पवारांच्या कृपेने जाधव यांना सरकारमध्ये तेव्हा मंत्रीपद तर मिळालेच, पण राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपदही दिले होते. राष्ट्रवादीने एवढा सन्मान देऊनही ते त्या पक्षात सुखाने का नांदले नाहीत? त्यांच्या कुटुंबातील एका विवाह सोहळ्यात लक्ष्मीचे भव्यदिव्य प्रदर्शन एवढे केले की, तेथे आशीर्वाद देण्यासाठी गेलेल्या शरद पवारांनाही तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती.
हेच जाधव शिवसेनेत असताना निवडणुकीच्या तोंडावर मातोश्रीवर पक्षप्रमुखांना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांना भेट मिळाली नव्हती. कलानगरच्या ड्रम गेटमधूनही त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा टीव्ही कॅमेरापुढे याच जाधव यांनी पक्षप्रमुखांना लक्ष्य करून कसा थयथयाट केला, हे जनता अजून विसरलेली नाही. सव्वा लाखांचा मासा मरण पावला, म्हणून साहेब दु:खी आहेत व आपल्याला भेट दिली नाही, हे तेव्हा कोण घसा फोडून सांगत होते? भास्कर जाधव यांनी उगीचच आमच्या नादी लागू नये. त्यांनी तोंड संभाळून बोलावे, तूर्त एवढेच…