दुबई (वृत्तसंस्था) : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्लूटीसी) गुणतालिकेत भारताने १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या पाकिस्तानने दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवी आकडेवारी जाहीर केली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाहच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १०९ धावांनी पराभव केल्याचा फायदा भारताला झाला.
भारताने इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एक कसोटी जिंकत प्रत्येकी १२ गुण मिळवले आहेत. समान गुण असले तरी विजयाची टक्केवारी चांगली असल्याने पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे.
भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ गुणांच्या यादीत अव्वल आहे, कारण संघाने इंग्लडविरुद्ध एक सामना जिंकला आहे. तर भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसऱ्या स्थानावर विंडीज संघ आहे, ज्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.
आयसीसी संघाची क्रमवारी गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाते. विजयासाठी १२ गुण, टाय सामन्यासाठी सहा गुण, अनिर्णित सामन्यासाठी चार गुण दिले जातात. मात्र, पराभवासाठी गुण दिले जात नाही.
(PRAHAAR)