X Close
X
9819022904

प्रेक्षकांसोबत माझं अतूट नातं तयार झालं आहे – शिवानी बावकर


shivani-bawkar-608x420

मुंबई : ‘झी मराठी’वरील ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या आगामी नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ७ ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतील शिवानीची व्यक्तिरेखा अगदी वेगळी आहे आणि त्याबद्दलच तिच्या सोबत साधलेला हा खास संवाद

* तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग.
– मी या मालिकेत पल्लवी नावाची व्यक्तिरेखा साकारतेय. पल्लवी ही लहानपणापासूनच खूप हुशार आहे आणि तिची हुशारी फक्त अभ्यासातच नसून ती एकंदरीतच खूप स्मार्ट आहे. तिची स्वप्नं खूप मोठी आहेत आणि तिला टिपिकल आयुष्य नाही जगायचं आहे. जेव्हा आपली स्वप्नं मोठी असतात तेव्हा परिस्थितीला शरण जाऊन माणसाने आयुष्याशी तडजोड करू नये तर ती परिस्थिती स्वतः बदलली पाहिजे, अशा मताची पल्लवी आहे.

* शीतलची व्यक्तिरेखा या मालिकेतील व्यक्तिरेखेपेक्षा किती वेगळी आहे?
– शीतलीची व्यक्तिरेखा खूप वेगळी होती. तिने तिच्या फौजी नवऱ्याच्या देशप्रेमावर प्रेम केलं, इतकंच नव्हे तर त्याच स्वप्नं जगण्यासाठी ती स्वतः देखील आर्मीमध्ये भरती झाली. पण अल्टी पल्टी या मालिकेमधील पल्लवी ही खूपच वेगळी आहे. तिला टिपिकल आयुष्य जगायचं नाही आहे आणि समाजाने घालून दिलेल्या चौकटींमध्ये तिला नाही राहायचं आहे. त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. तिचा हेतू वाईट नाही आहे आणि तिच्यामुळे चांगल्या लोकांना कधीच नुकसान होणार नाही.

* मालिकेच्या प्रोमोजनंतर तुला प्रेक्षक-चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या?
– ‘लागिरं झालं जी’ ही मालिका संपल्यानंतर मला अनेक चाहत्यांचे मेसेजेस आले. सोशल मीडियावर त्यांनी माझ्या पोस्ट्सवर अनेक प्रतिक्रिया दिल्या. या सर्व प्रतिक्रिया मी वाचते कारण त्यांनी त्या भावनिक होऊन दिलेल्या प्रतिक्रिया असतात. चाहते प्रेक्षक यांच्यासोबत माझं एक अतूट नातं तयार झालं होतं. त्यामुळे जेव्हा मला नवीन मालिकेत संधी मिळाली तेव्हा माझ्या इतकाच प्रेक्षकांना देखील आनंद झाला. प्रोमोज रिलीज झाल्यावर मला लगेचच सांगल्यांचे मेसेजेस यायला लागले. त्यांनी मला खूप मिस केलं असल्यामुळे मी पुन्हा एकदा नवीन मालिकेतून त्यांच्या भेटीला येते आहे हा त्यांच्यासाठी एक सुखद धक्का होता. माझ्या या मालिकेसाठी देखील माझे चाहते आणि प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत असं त्यांनी मला त्यांच्या प्रतिक्रियांमधून कळवलं. त्यांचा हा उत्साह बघून मला खूप छान वाटलं.

* मालिकेबद्दल थोडक्यात सांग
– दोन व्यक्ती ज्यांची स्वप्नं खूप मोठी आहेत ते दोघे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एकत्र एका प्रवासाला सुरुवात करतात. त्यांचा हा प्रवास अल्टी पल्टी या मालिकेतून प्रेक्षकांसाठी सादर केला जाईल. या मालिकेत खूप मजेशीर प्रसंग प्रेक्षकांच्या भेटीस येतील. या मालिकेची हाताळणी खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे प्रेक्षक देखील ही मालिका एन्जॉय करतील.

* तू खऱ्या आयुष्यात कधी कोणाला शेंडी लावली आहेस का?
– खऱ्या आयुष्यात मी कधीच कोणाला शेंडी लावलेली नाही कारण मला मुळातच खोटं बोलणं जमत नाही. मी कधी खोटं बोलली तर मला समोरून लोक मला सांगतात कि तुला खोटं बोलता येत नाही आणि ते तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात शिवानी ही पल्लवीपेक्षा खूप वेगळी आहे. मी कधीच खोटं बोलून संकटाला निमंत्रण देत नाही कारण जर मी खोटं बोलली तर मला स्वतःला ते काही काळाने लक्षात राहणार नाही. या उलट पल्लवी लोकांना तिच्या बोलण्यात रमवून ठेवू शकते.

(PRAHAAR)