X Close
X
9819022904

पुरग्रस्तांची व्यथा: ‘माझ्या पायाचे ऑपरेशन झालेय दोन दिवसांपासून रांगेत उभी आहे, तरी पैसे मिळेनात’


IMG-20190822-WA0058-696x376

तासगाव : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाली आहेत. त्यात शासनाने पुरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून ५ हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनाकडून ही मदत मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सर्वच स्थरातून मदत होते.

मात्र, अजूनही सांगली जिल्हातील कृष्णा काठच्या गावातील पुरग्रस्तांना मदतीसाठी २-३, दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. गावातील लोक मदत मिळवण्यासाठी दररोज रांगेत उभे राहतायत. गावातील लोकांचे म्हणणे आहे की अजूनही मदत मिळाली नाही. दररोज येतोय मात्र मदत मिळत नाही. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच ही मदत दिली जात आहे. मात्र, तेथील अधिकारी १२ वाजता येऊन ५ वाजता बंद करतात, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

“दिवसभर लोकं काही न खाता- पिता, न जेवता लोकं उपाशीपोटी आशेने अनुदान मिळेल म्हणून रांगेक उभे रहातात. रांगेत नंबर लावण्यासाठी काही लोक रात्री देखील इथेच राहतात. असे एका गावक-याने सांगितले.

रांगेत उभ्या असलेल्या आजींनी सांगितले की पायाचे ऑपरेशन झालेय तरी मी २ दिवस रांगेत उभी आहे. अजून पर्यंत पैसे मिळाले नाहीत.

रांगेत उभा असलेल्या एका लहान मुलाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, पैसे संपल्यावर अधिकारी अनुदान बंद करतात, मी तीन दिवस येतोय आणि रांगेत उभा राहतोय, अजूनही नंबर आला नाही.

रांगेत उभे असल्यामुळे जेवत पण नाही, जेवण करू कुठं, सर्व घर पुरात गेलंय. ५००० कोणाला पुरणार आहेत? पुरामुळे सर्व घर घाण झालंय… जर अनुदान नाही घेतलं तर घर कसं चालवायचं, त्यामुळे घर बघावं की अनुदान अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची झाली आहे. जनावरांना सुद्धा काही खायला नाही, म्हणून रडायला येतं.

सरकारने नियोजन करावं, या पाण्याने सर्व वाहून नेलं, आम्ही असंच दिवस घालवत बसायचं आणि या अनुदानाच्या रांगेत उभं राहायचं का? अशी खंत पुरग्रस्तांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली.

गावाला पुराचा तडाखा बसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. घरे पडली, जनावरे वाहून गेली, होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे शासनाच्या मदतीची आस लागलेली असणा-या या पुरग्रस्तांना दोन ते तीन दिवसापासून ५ हजारासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने या पुरग्रस्तांच्या मनातील व्यथा जाणून घेऊन त्यांना रांगेत ताटकळत उभा न ठेवता, तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

(PRAHAAR)