भिवंडी (वार्ताहर) : थोड्याच दिवसात मान्सून दाखल होणार आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात दर वर्षी अनेक सखल भागात पाणी साचत असल्याने मान्सूनपूर्वीचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी ठाणे यांनी भिवंडी मनपाकडे स्पीड बोट सुपूर्द केली आहे. येत्या काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व तहसीलदार आणि महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागांची आढावा बैठक आयोजित केली आणि मान्सून पूर्वच्या धोक्याला तोंड देण्याच्या तयारीचा आढावा घेतला.
त्यासोबतच आगामी धोक्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या कामवारी नदीमुळे दर वर्षी शहरातील सखल भागात पाणी तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्याशिवाय नदीच्या काठावर दाट वस्तीत लोक राहतात. नदीच्या काठी शेलार, खोणी, म्हाडा कॉलनी, ईदगाह अशा अनेक काठांवरील दाटवस्तीत पुराच्यावेळी पालिका प्रशासनाकडून स्पीड बोटीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याचे व दिलासा देण्याचे काम केले जाते.
मात्र मनपा प्रशासनाकडे स्पीड बोट नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख फैसल तातली यांनी माजी आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्राद्वारे कळवली. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ही समस्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली होती. त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाने मनपा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाला स्पीड बोट सुपूर्द करण्यात आली. त्या स्पीड बोटीची चाचणी वऱ्हाळदेवी तलावात आपत्कालीन विभागाचे प्रमुख फैसल ततली यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
(PRAHAAR)