मोबाईलच्या गरजेचं रूपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. त्यातूनच सोयीपेक्षा हा मोबाईल आपलं जगणंच हैराण करून सोडताना दिसतोय.
मोबाईल संस्कृती मुलांसाठी घातक ठरत आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी स्वत: कामावरून घरी आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवावा, मुलांशी सुसंवाद साधावा. पालकांच्या कृतीतूनच मुले बोध घेत असतात. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या कृतीतून आपल्या मुलांसाठी आदर्श घालून द्यावा, असे मत दीप-अर्चन संस्थेचे संचालक डॉ. नेमळेकर यांनी व्यक्त केले. मोबाईल फोनचा अतिवापर आणि सोशल मीडियाचे किशोरवयीन विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम या विषयाच्या आनुषंगाने विद्यार्थी आणि पालकांसाठी परिसंवादाचे नुकतेच चेंबूर येथे आयोजन करण्यात आले होते.
जन्म देणारे हे मुलाचे जैविक पालक असतात; परंतु घराबाहेर मुलाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती मग ती शिक्षक असेल, मित्र असेल किंवा एखादा सहप्रवासी असेल हा देखील अजैविक पालकच आहे. जैविक पालकांप्रमाणेच या मुलांवरील पालकत्वाची जबाबदारी या अजैविक पालकांवर देखील आहे. त्यामुळे आजच्या काळात पालकत्व ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ठरत आहे. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठीच ‘जागो पालक’ या चळवळीचा जन्म झाला आहे, असे मत जागो पालक संस्थेचे संस्थापक संदीप मोरे यांनी व्यक्त केले.
या परिसंवादास दीप अर्चन संस्थेचे संचालक डॉ. संदीप नेमळेकर, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुशांत नागरेकर, श्री कोचिंग इन्स्टिटय़ूटचे संचालक व ‘जागो पालक’ चळवळीचे प्रवर्तक संदीप मोरे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आयटी प्रोसेस विभागाचे उपाध्यक्ष अशोक असावाले, आयुर्विमा महामंडळाच्या चेंबूर शाखेचे अध्यक्ष गजानन पाटील, अमोल गोडसे, प्रवीण गाडगे, अमोल जांभेकर, सचिन शिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादामध्ये ‘करिअर टॉक’ हा विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन करणारा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे संचालक प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमातील व्यावसायिक संधी, ग्रीनस्काय डेव्हलपर्सचे संचालक दत्ता आदाटे यांनी रिअल इस्टेटमधील उद्योगाच्या संधी, शेअर बाजार तज्ज्ञ अजित वाव्हल यांनी शेअर बाजारातील संधी, अॅड विजय रावराणे यांनी विधी क्षेत्रातील करिअरच्या वाटा, कला दिग्दर्शक सुशांत पांचाळ यांनी कलादिग्दर्शनमधील करिअर आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
श्री कोचिंग इन्स्टिटय़ूट यांनी ‘विद्यार्थी आणि पालक’ यांच्यामध्ये सुसंवाद घडावा, विद्यार्थ्यांच्या करिअरला वळण लागावं या हेतूने आयोजित केलेल्या परिसंवादातून ‘जागो पालक’ चळवळ ही भावी पिढीसाठी दिशादर्शक असून काळाची गरज आहे, असे मत उपस्थित पालकांनी यावेळी व्यक्त केले.