केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेची अंमलबजावणी, कचरा गाडय़ांवर पालिका बसवणार यंत्र
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबई महापालिका विविध योजना राबवत आहे. तरीही मुंबईतील कचराप्रश्न पालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय होत आहे. मुंबईकरांसह मुंबईत येणा-या लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी कच-याच्या गाडय़ांवर ध्वनिक्षेपक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्वच्छतेविषयी जनजागृती, उद्घोषणा, स्लोगन, गाणी वाजविणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्वच्छेतेविषयक जनजागृतीसाठी पालिकेचे हे पुढचे पाऊल मानले जात आहे.
सन २०२०च्या स्वच्छ सर्वेक्षण उद्दिष्टपूर्तीसाठी स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कचरा जमा करणा-या गाडय़ांवर ही ध्वनिक्षेपण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात सर्वाना सोयीस्कर पडेल, अशा ठिकाणी कचरा संकलन केंद्रे (हायवा) आहेत. प्रभागातले नागरिक तेथे जाऊन कचरा टाकू शकतात. शिवाय इतर ठिकाणचा कचरा तेथे आणण्यासाठी चारचाकी छोटय़ा गाडय़ा आहेत. दस्तक वस्ती योजनेद्वारेही घरोघरचा कचरा जमा करण्यात येत आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी डबे देण्यात आले आहेत. शिवाय अरुंद गल्ल्या असलेल्या ठिकाणी आता तीन चाकी गाडय़ा (सायकल) वापरण्यात येत आहेत. महापालिकेतर्फे वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. तरीही पालिकेकडून स्वच्छता उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. त्यामुळे आता स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीसाठी कच-याच्या गाडय़ांवर ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
ध्वनिक्षेपण यंत्रणा असलेली एकूण १३०५ वाहने मुंबईभर फिरणार असून प्रत्येक वाहनावरील ध्वनिक्षेपण यंत्रणेला ६ हजार ७८५ रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे अन्य खर्चासह पालिकेला एकूण ९२ लाखांचा भार पडणार आहे.
ध्वनिक्षेपक असलेल्या गाडय़ा कचरा संकलनाच्या वेळी प्रभागात फिरताना स्वच्छतेचा संदेश देणारे गीत प्रसारित करीतच फिरणार आहेत. त्यामुळे गीतातूनच स्वच्छतेचा संदेश मिळत असल्याने नागरिकांच्या ते मनी भिडणार आहे. जनजागृतीसाठी घोषणाही देण्यात येणार आहेत. दररोज घोषणा कानी पडल्याने आणि गीतगुंजन होणार असल्याने नागरिकांच्या प्रवृत्तीत घडणारा बदल स्वच्छतेसाठी पोषक ठरणार आहे.
२४ विभागात यंत्रणा राबवणार
सध्या डी विभागात ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वांवर राबविण्यात येत आहे. तेथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याप्रमाणे पालिकेच्या इतर २३ विभागात ही यंत्रणा राबवली, तर स्वच्छ भारत मिशननुसार स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठता येईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. त्यामुळे डी विभागासह एकूण २४ विभागात ध्वनिक्षेपण यंत्रणा राबविण्यात येणार आहे.