मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या मुंबईसह राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू झाल्या. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेल्या.
खरंतर, राज्य सरकारने यापूर्वी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानंतर, आता मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतल्या शाळा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. तसेच, पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली होती. शाळा सुरू झाल्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर शाळेचे वर्ग भरलेले पाहायला मिळाले, तर विद्यार्थीही खूश दिसत होते.
मुंबईतील अनेक शाळा आणि महापालिकेच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र पालकांच्या संमतीपत्रानेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन, मिठाई देऊन, तर काही ठिकाणी वाजत-गाजत स्वागत केले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सर्वच शाळा बंद होत्या. मात्र आजपासून मुंबईसह सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले असून शाळांची स्वछता, निर्जंतुकीकरण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, तर पालकांचे संमतीपत्र सादर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. त्यामुळे कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण शाळांचे निर्जंतुकीकरण केले असून त्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करून घेण्यात आल्या आहेत. तसेच एका बेंचवर एक या प्रमाणे विद्यार्थ्यांना बसविण्यात आले आहे, तर शंभर टक्के उपस्थितीची अट देखील शिथिल करण्यात आली असून पालकांच्या संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश मिळणार आहे.
त्यामुळे ऑनलाइन वर्ग देखील सुरू असणार आहेत. ज्या मुलांना शाळेत यायचे नसेल अशा मुलांना ऑनलाइन अभ्यासक्रम शिकता येणार आहे, तर रोज विद्यार्थ्यांचे दैनंदिनी तापमान नोंदवूनच शाळेत प्रवेश दिला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना आखून दिलेल्या चौकोनाप्रमाणे शाळेत प्रवेश करणे, तसेच प्रवेश केल्यानंतर आपले नाव व नंबर असलेल्या बेंचवरच त्यानी बसायचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ साबण बाळगावा, वर्गमित्रांसोबत डबा खाऊ नये, एकत्र खेळू नये, असे नियम विद्यार्थ्यांना पाळावे लागणार आहेत.
शाळा सुरू होत असल्या तरीही कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट आदेश शासन-प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची मंजुरी असणे आवश्यक, विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठी असल्यास एक दिवस आड शाळेत येणे, एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश, एका बाकावर एकच विद्यार्थी, सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्क घालणे, तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य, कोरोनाची लस घेतली नाही म्हणून अनुपस्थित राहण्याची मुभा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही.
पुणे शहरातील काही शाळांनी मुलांचे औक्षण करून तर काहींनी चॉकलेट देऊन स्वागत केले. असे असताना पुण्यात एक धक्कादायक बाब समोर आली असून शाळेची फी न भरल्यामुळे पहिल्या दिवशी शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली.
त्यामुळे शाळेबाहेर पालकवर्ग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.कोरोनामुळे बहुतांश जणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकांना शाळेच्या फी भरता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शाळांकडून फी भरण्याची सातत्याने मागणी होत आहे.