नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. या कालावधीत अनेक उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनलॉकच्या टप्प्यात केंद्रानं रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये आता रेस्टॉरंट सुरू झाली असून दिल्लीत केजरीवाल सरकारनं दिवसरात्र रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त आता दिल्लीत रेस्टॉरंट चालवण्यासाठी टुरिझम परवाना किंवा अन्य काही परवान्याची गरज भासणार नाही.
दिल्ली सचिवालयात नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिका-यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान रेस्टॉरंट क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. असोसिएशनच्या काही सूचना लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
दिल्ली सरकार नवी एक्साईज पॉलिसी तयार करणार आहे. यामध्ये या क्षेत्रातील काही सूचनांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. पोलिसांकडून परवाना घेण्याची अट रद्द करण्यासोबतच अग्नीशमन दलाकडून घेण्यात येणा-या परवान्याचीही प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पालिकांकडून देण्यात येणा-या हेल्थ ट्रेड परवान्याची अट समीक्षेनंतर रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, आता दिल्लीतीर रेस्टॉरंट चालकांना कमीतकमी परवाने घ्यावे लागणार आहेत.
(PRAHAAR)