मुंबई : मुंबईसह उपनगरात मंगळवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अंधेरी आणि दादरमध्ये बुधवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागांत पावसाचा जोर दिवसभर कायम होता. सतत सुरू असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचले होते. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळनंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत होती. दरम्यान, मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान, मुंबईत बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्ले परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून या परिसरात २१४.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने बुधवारी सकाळपासून जोर धरल्याने मुंबईची दाणादाण उडाली. रेल्वे रुळांवर आणि सखल भागांमध्ये पावसाचे पाणी गुडघ्यापर्यंत साचल्याने त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला. बुधवारी सकाळी ११ नंतर हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवाही ठप्प झाली. मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर, कुर्ला, चुनाभट्टी, शीव, माटुंगा आदी परिसरात रेल्वे रुळांवर प्रचंड पाणी साचल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घाटकोपर, कुर्ला, विक्रोळीत लोकल थांबल्याने सकाळी ११ नंतर कल्याणहून एकही लोकल मुंबईच्या दिशेने गेली नव्हती. तर बेलापूर येथेही रेल्वे रुळाखालची मातीच वाहून गेल्याने सीबीडी बेलापूर ते उलवे दरम्यानची रेल्वे सेवाही बंद ठेवण्यात आली होती. हार्बरची मुंबईकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात आली होती. मध्य रेल्वेवर लोकलच्या एकामागून एक रांगा लागल्याने प्रवाशांनी लोकलमधून उडय़ा मारत रेल्वे पटरीवरूनच पायपीट सुरू केली. तशीच परिस्थिती पश्चिम रेल्वेवरही होती. पश्चिम रेल्वेवरही रूळ पाण्याखाली गेल्याने अंधेरी ते चर्चगेटदरम्यान वाहतूक ठप्प झाली. मात्र सायंकाळी पाणी ओसरल्यानंतर साडेपाचच्या सुमारास अंधेरीहून चर्चगेटसाठी पहिली लोकल सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी चाकरमान्यांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागला. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्याच सुमारास कुल्र्याहूनही ठाण्याच्या दिशेने खचाखच भरलेली पहिली लोकल रवाना झाली. मात्र सीएसएमटी ते कुर्ला आणि ठाणे ते कर्जत दरम्यानची वाहतूक सायंकाळी उशीपर्यंत सुरू न झाल्याने सकाळीच मुंबईत कामासाठी आलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. कामावरून सुटलेले अनेक कर्मचारी सीएसएमटी, भायखळा, दादर, परळ, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर स्थानकात खोळंबले आहेत. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली होती. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. मुंबई आणि उपनगराला बुधवारी सकाळपासून पावसाने झोडपून काढले. मुंबई वेधशाळेने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात पुढच्या २४ तासांत अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टी होत आहे. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तेराशे लोकांचे स्थलांतर बुधवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे कुर्ला पश्चिममधील मिठी नदीजवळ असलेल्या क्रांती नगर परिसरातील तेराशे लोकांचे स्थलांतरित करण्यात आले असून जवळच्या पालिका शाळेत या रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या आपात्कालीन पथकासह एनडीआरएफचे पथक याठिकाणी दाखल झाले असून परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. महापौर बंगल्यातील ठाकरे स्मारकात झाड कोसळले दादर येथील जुन्या महापौर बंगल्यात म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात बुधवारी दुपारी एक झाड कोसळले. त्यामुळे महापौर बंगल्याची भिंत कोसळली आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही दुदैर्वी घटना घडली नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. या भिंती लगत एक कार उभी होती, झाड कोसळल्याने या कारचा चक्काचूर झाला आहे. सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. पावसामुळे सायन पनवेल मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली हे. तसेच कुर्ला एलबीएस मार्गावर आणि वडाळा स्थानकात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचत आहे. पावसाचा फटका रस्ते व रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे. रायगडमध्ये नद्यांना पूर, सतर्कतेचा इशारा रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किना-यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली. रोहा खिंडीत दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक बंद झाली. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भोर घाटही बंद असल्याने दक्षिण रायगडमधून पुण्याला जोडणारे दोन्ही मार्ग बंद झाले. मरुड रोहा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत आहे. पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर जांभूळपाडा पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली. मोर्बा पूलावरून पुराचे पाणी गेल्याने माणगाव श्रीवर्धन वाहतूक रोखण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अनेक रस्ते पाण्याखाली पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार कायम आहे, तर काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. तसेच, नदी-नाल्यांनाही पूर यायला सुरुवात झाली आहे. पालघर-बोईसर रस्त्यावर सरावली येथे पाणी साचले आहे. तर, वाणगाव परिसरातही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाणगाव-डहाणू रस्त्यावर वाहतूक बंद आहे. बोईसर-चिल्हार रस्त्यावर बेटेगाव येथे पाणी साचल्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद आहे. वसई-विरार भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम थेट पश्चिम रेल्वे वाहतुकीवर पाहायला मिळतो आहे. नालासोपाराला रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे विरार-वसई रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणा-या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ाही विरार रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील वाशी-सीएसटी मार्गावरील रेल्वे वाहतूक बुधवारी पूर्णपणे बंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे कोकणात जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली आहे. नागोठण्यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत होते. कोयनेचे दरवाजे आठ फुटांनी उघडले कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाणी मोठय़ा प्रमाणात साचू लागले आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात ७३ हजार ०६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी उघडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. (PRAHAAR)