नवी दिल्ली (प्रतिनिधी): हिंदूंची श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांच्या इतिहासावर नजर टाकताना मंदिरांचा वारंवार विध्वंस आणि प्रत्येक विध्वंसानंतर मंदिर जोमाने उभे राहिल्याचे दिसून येते. सत्याचा पराभव करता येऊ शकत नाही आणि दहशतीच्या बळावर श्रद्धा चिरडता येत नाही याचे हे प्रतिक आहे.
काही हल्लेखोर सोमनाथ उध्वस्त करत असतानाही त्याची प्रचिती वारंवार आली होती. त्याचप्रमाणे आजच्या काळात अशा मानसिकतेची जगाला धास्ती असतानाही त्याची प्रचिती येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील सोमनाथ येथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी माजी उप-पंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे
सोमनाथाचे मंदिर उध्वस्त करणाऱ्या मानसिकतेची जगाला अद्यापही धास्ती आहे. दहशतवादाच्या पायावर जम बसवू पाहण्याचा विचार करणाऱ्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील. पंरतु, त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत; असे त्यांनी नमूद केले.
सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी आणि नुतनीकरण हे शतकापासूनची इच्छाशक्ती आणि वैचारिक अखंडतेमुळे शक्य झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि के एम मुन्शी यांच्यासारख्या महान व्यक्तींना स्वातंत्र्यानंतरही या अभियानासाठी आव्हानांना तोंड द्यावे लागले.
अखेर १९५० मध्ये आधुनिक भारताचा दिव्य स्तंभ म्हणून सोमनाथ मंदिर उभारले गेले. कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु असून राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ आकारास येत आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.