औरंगाबाद : चंद्रकांत पाटील यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. ते मतदारसंघाची चाचपणी करत आहेत. ते ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले, तर मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी केली.
ते औरंगाबादमध्ये बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे राधानगरी, कोल्हापूर शहर व चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत. त्या संदर्भात विचारले असता, शेट्टी यांनी हे उत्तर दिले.
मराठवाडय़ासह राज्यात मोठा दुष्काळ आहे. शेतक-यांची कर्जमाफी झाली नाही. शेतक-यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. अशावेळी त्यांना दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. अशा प्रकारची यात्रा काढून ते शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला.
राज्यातील शेतक-यांचा सातबारा सरसकट कोरा करा, महा पोर्टल पवित्र पोर्टल रद्द करा, पोलीस भरती, शिक्षक भरती, एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात आदी मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शेट्टी बोलत होते.
शेतकरी आणि युवकांच्या विविध प्रश्नांसाठी युवकांनी मोर्चा काढला होता. आंदोलनाचे नेतृत्व करणा-या पूजा मोरे यांना पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची आणि संताप आणणारी आहे, अशा प्रकारची दडपशाही चालणार नाही. आमच्या लेकीबाळींकडे वाकडय़ा नजरेने पाहाल, तर याद राखा, असा इशारा त्यांनी दिला.
(PRAHAAR)