X Close
X
9819022904

ज्येष्ठ लेखक, नाटककार, अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन


Girish-Karnad

बंगळुरू : ज्येष्ठ लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बंगळुरूतील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ मध्ये झाला होता. रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे आहे. वडील रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर होते. आई कृष्णाबाई ऊर्फ कुट्टाक्का-बालविधवा असलेल्या त्यांनी डॉ. कर्नाडांशी विवाह केल्यानंतर सामाजिक टीका झाली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते.

सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. गिरीश कर्नाड यांनी चित्रपटसृष्टीत ‘वंशवृक्ष’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमीळ, मराठी अशा ७०हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. ह्रदयवन, तुघलक, नागमंडल या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते. १९९४ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

१९८२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग असे. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.

गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. ‘युनेस्को’तर्फे जागतिक रंगभूमीचा राजदूत म्हणून गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती.

अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही ते ओळखले जायचे.

(PRAHAAR)