जळगाव, नाशिकमध्ये पाऊस, गारा आणि वादळामुळे शेतक-यांचे नुकसान
जळगाव/नाशिक : जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांना पाऊस, गारा आणि वादळी वा-याचा जबरदस्त तडाखा बसला. नाशिक जिल्ह्यातील बालठाण तालुक्यात वादळामुळे घरांचे, शाळेचे छप्पर उडून गेले, तर दोन गायींचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि यावलमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे १४ तालुक्यांतील १२०० शेतक-यांची ११०० हेक्टरवरील केळी व अन्य पिके उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या. यात धानोरा, मितावली, पारगाव, कमळगाव, पिंप्री, देवगाव, पुनगाव, पंचक, लोणी, खर्डी, वटार, सुटकार, अडावद, वडगाव या भागात संपूर्ण केळी आडवी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बोलठाण परिसरात झालेल्या वादळी पावसाने कल्पना गायकवाड यांचे कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्यामुळे त्यात साठवलेला १०० टन कांदा भिजून नुकसान झाले. तेथे असलेल्या दोन मोठ्या गीर गायींचा जागीच मृत्यू झाला आहे. वीजपुरवठ्याचे अनेक खांब कोलमडून पडले असून वीजवाहिन्या तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वसंतनगर येथे चंद्रभान काळू चव्हाण यांच्या कांदा चाळीवरील २० पत्रे उडाल्याने त्यात साठवलेला सुमारे १५० क्विंटल कांदा ओला झाला. तर नामदेव काळू चव्हाण यांच्या राहत्या घरावरील ४० पत्रे, रतन चव्हाण यांच्या घरावरील २० पत्रे आणि उत्तम चव्हाण, हरी चव्हाण या दोघा भावांच्या घरावरील ४० पत्रे उडाले आहेत. वसंतनगर दोन येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गाचे पूर्ण पत्रे उडाले आहेत. (PRAHAAR)