मुंबई : राज्य शासनातर्फे गिरणी कामगारांना देण्यात येणार्या घरांसाठी एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त कुटुंबांनी अर्ज केले असल्यास पात्र व्यक्तींचे अर्ज बाजुला काढून अन्य अर्ज निकाली काढा, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकार्यांना दिले.
गिरणी कामगारांच्या घरांसाठी अनेक गिरणी कामगार संघटना गेली अनेक वर्षे म्हाडा विरोधात लढा देत आहे. गिरणी कामगारांनी घरे मिळवण्याकरीता आजपर्यंत १ लाख ७५ हजार अर्ज करण्यात आले आहेत. म्हाडाच्या लॉटरीमध्ये १ वर्षांमध्ये अंदाजे १ हजार घरे उपलब्ध होणार आहे. सर्व गिरणी कामगारांना घरे मिळणेस वर्षानुवर्षे कालावधी लागणार असल्याचे राज्यमंत्री यांना पत्राद्वारे निदर्शनास आणुन, विधानसभा सदस्य प्रकाश अबिटकर यांनी मंगळवारी राज्यमंत्री वायकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी त्यांच्या समवेत गिरणी कामगार संघटनेचे काही नेतेही उपस्थित होते. गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावीत, अशी विनंतही आबिटकर यांनी राज्यमंत्री यांना केली.
गिरणी कामगारांच्या घरासाठी १ लाख ७४ हजार कामगारांनी अर्ज केले आहेत. ३७ गिरण्यांची जागा म्हाडाला उपलब्ध झाली आहे. या गिरण्यांमधुन १६,५०० घरेच उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकार्यांनी राज्यमंत्री यांना दिली. मुंबईत जागा नसल्याने उर्वरित गिरणी कामगारांनाही घरे उपलब्ध करुन देण्यासाठी अन्य जिल्ह्यातील जागांची निवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी राज्यमंत्री वायकर यांच्या निदर्शनास आणले. यातुन अंदाजे अतिरिक्त २४ हजार घरे उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले. परंतु गिरणी कामगारांच्या एकाच कुटुंबातील अन्य व्यक्तींनीही घरांसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे पात्रता निश्चित करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकार्यांनी दिली.
यावर मार्ग काढताना राज्यमंत्री वायकर यांनी, गिरणी कामगारांच्या ज्या कुटुंबांतील व्यक्तींनी एका पेक्षा जास्त अर्ज केले आहेत. त्यातील पात्र अर्ज बाजुला काढून उर्वरित अर्ज बाजुला काढून ते निकाली काढावेत. पात्र अर्ज बाजुला काढल्यावर त्या अर्जाची छाननी करुन पात्रता निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी म्हाडाच्या अधिकार्यांना दिले.
(PRAHAAR)