सुनील चव्हाण
कोयना अवजल मराठवाडय़ाकडे नेण्याचा सुतोवाच नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे कोयना अवजलाची पुन्हा एकदा नव्याने चर्चा झडू लागली असून, या चर्चेला आता राजकीय स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. कोयना अवजलाच्या विषयात राजकारण नको, असे सर्वसामान्यांचे मत आहे. कोयना अवजलाचा वापर सर्वप्रथम कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी व्हावा, असाही मतप्रवाह आहे आणि त्यानंतर कोयना अवजल इतरत्र न्यावे, असा सूर लावला जात आहे.
साधारणत: २००५ मध्ये कोयना अवजलाचा विषय चर्चेत आला होता. त्याआधी युतीच्या राजवटीत कोयना अवजल मुंबईत नेण्याचा विषयही पुढे आला होता. कालातंराने हा विषय बारगळला. कोयनेचे सुमारे १९११ दक्षलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी वाशिष्ठी खो-यात उपलब्ध होते. हे सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळत असल्याने मोठय़ा प्रमाणात वाया जाणा-या पाण्याचा वापर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी केला जावा, असा विचार सुरू झाला.
बाबासाहेब कुपेकर विधिमंडळाचे सभापती असताना त्यांनी कोयना अवजलाच्या वापरासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमण्यात आला. या अभ्यासगटात कोकणचे सुपुत्र आणि कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांचाही समावेश करण्यात आला. या समितीकडून कोयना अवजलाच्या वापरासंदर्भात अभ्यास करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला.
या अहवालात समितीने खेड, चिपळूणसह अन्य गावांना प्रथम पाणी देण्याचे सूचित केले आहे. त्याशिवाय कोकणातील उद्योगधंद्यांनाही या पाण्याचा वापर शक्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोयना अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेणे शक्य असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोकणात पडणा-या पावसाची सरासरी भरपूर असली तरी, फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांत, वाडय़ांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागते. खेड तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर बनते. त्यामुळे कोयना अवजलाचा वापर अशा गावातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी होणार असल्याने या गावांना पाणी देण्याचे पेंडसे अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीदेखील कोयना अवजलाचा वापर होणार असल्याने अनेक गावांतील जमिनी सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोयना अवजलाच्या वापराबाबत समितीकडून ठोस शिफारशी करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी प्राधान्याने या अवजलाचा वापर होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे.
कोयना अवजल इतरत्र नेण्याच्या आनुषंगाने सातत्याने चर्चा होत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडय़ात कोयना अवजल नेण्याचा सुतोवाच करून या चर्चेला सुरुवात केली आहे. कोयना अवजलाचा वापर सर्वप्रथम कोकणसाठी झाला पाहिजे, असा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात असून, कोकणातील पाणी मराठवाडय़ापर्यंत नेण्याच्या उपक्रमाकडे डोळसपणे पाहूया, असा सूरही आळवला जात आहे.
कोयना अवजलाच्या विषयात राजकारण न आणता त्याचा वापर कशापद्धतीने करता येईल, याचा विचार सर्वानी करण्याची आवश्यकता असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयना अवजल मराठवाडय़ात नेत असताना हे अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कसे नेता येईल यादृष्टीने विचार करावा, असेही बोलले जात आहे. यातूनच दोन्ही जिल्ह्यांतील पाणीटंचाई कमी होईल आणि सर्वाना पाण्याची उपलब्धता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोयनेच्या अवजलाने मराठवाडा सुजलाम सुफलाम झाला तर सर्वानाच त्याचा आनंद आहे. त्याचबरोबर खेड, चिपळूणसह अन्य भागांत फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोयना अवजालाचा वापर शक्य होईल. त्यादृष्टीने सकारात्मक विचार व्हावा, असे मत मांडले जात आहे. कोयना अवजलाच्या विषयात राजकारण न आणता पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होण्याच्या दृष्टीने त्यावर विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जावा, अशी भूमिका सर्वसामान्यांकडून मांडली जात आहे.