अजय गोरड : प्रहार वेब टीम
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेल्या दोन नेत्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या विखे पाटलांना सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी देण्यात आली तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी विखेंनंतर शपथ घेतली. यातून युतीने एक संदेश दिल्याचे मानले जात आहे.
फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात पार पडला. यात भाजपच्या १० तर शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवले गटाच्या अविनाथ महातेकर यांच्यासह एकून १३ जणांचा आज शपथविधी झाला. मात्र, यात आयात नेते विखे आणि क्षीरसागर यांना शपथ घेण्याची सर्वप्रथम संधी देण्यात आली. हे दोन्हीही नेते ज्येष्ठ व बडे असले तरी आयात नेत्यांना मंत्रिपद देण्याबाबत भाजप-शिवसेनेतर्गंत धुसफूस सुरू होती. आम्ही वर्षानवर्षे पक्षाचे काम करत आहोत मग आयात नेत्यांना लागलीच मंत्रिपदाची संधी कशी काय देता असा सवाल काही ज्येष्ठ आमदारांनी खासगीत उपस्थित केला होता. दोन्ही पक्षात अशी धुसफूस असतानाही पक्षासाठी जे योग्य तेच केले जाईल असा देण्यासाठी या दोन्ही नेत्यांना युती सरकारमध्ये आजच्या शपथविधी समारंभात सर्वप्रथम शपथ देण्यात आल्याचे सांगितले जाते.
राधाकृष्ण विखे यांच्यासारखा अनुभवी व बडा नेता भाजपमध्ये आल्याने पक्षाला अहमदनगरमध्ये आपली पाळेमुळे मजबूत करता येणार आहे. नगरमध्ये राम शिंदे वगळता भाजपकडे एकही ताकदीचा नेता नाही. शिवाय शिंदे हे ओबीसी वर्गातून येत असल्याने मराठा नेत्याची भाजपला नगरमध्ये नितांत गरज होती. विखेंच्या रूपाने ती भरून काढण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांना महत्त्व देऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. विखेंनी काँग्रेसच्या सर्व पदाचा व आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. सध्या ते विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत तरीही त्यांना मानाचे पान देऊन भाजपने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मजबूत पावले टाकण्यास सुरूवात केल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही उद्धव ठाकरे यांनी महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विखेंनंतर क्षीरसागर यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामुळे मराठवाड्यात खासकरून बीडमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होईल असे गणित मांडले जात आहे. क्षीरसागर हे ओबीसी वर्गातून येतात. मराठवाड्यातील मराठा समाज हा ब-यापैकी शिवसेनेसोबत आहे. आता क्षीरसागर यांच्या रूपाने ओबीसी समूह सेनेकडे खेचला जाऊ शकतो. राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागर यांची ज्या पद्धतीने कोंडी केली होती ते पाहता क्षीरसागर राष्ट्रवादीला धडा शिकविण्याचा प्रयत्न करतील व याचा शिवसेनेला फायदा होईल. यासोबतच पक्षातंर्गत नेत्यांना व आमदारांना फार फडफड करू नका. पक्षहित ज्यात असेल तेच निर्णय होतील असा संदेश युतीच्या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिल्याचे मानले जात आहे.