नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गावर प्रतिबंध यावे म्हणून शासनाने ऑनलाइन आध्यापन प्रक्रिया गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राबविली आहे; परंतु ऑनलाइन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच आता दुसऱ्या शैक्षणिक वर्षातही कोरोनाच्या धास्तीने ऑनलाइन शिक्षण पद्धतीस सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात आरोग्याचा त्रास झालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर विद्यार्थ्यांच्या देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, म्हणून नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
नवी मुंबई परिसरात खऱ्या अर्थाने मार्च २० मध्ये कोरोनाच्या महामारीस सुरुवात झाली. त्यानंतर २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिक्षण पद्धतीत गेले. गेल्या वर्षात विद्यार्थ्यांच्या कानाला त्रास होणे तसेच इतर शारीरिक व्याधी वाढली. तसेच डोळ्यांची दुखणीही वाढली. पुन्हा २०२१/२२ या शैक्षणिक वर्षात देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः काळजी घेण्याची गरज भासत आहे. जर विद्यार्थी प्राथमिक शाळेतील असेल तर त्याकडे आई-वडिलांनी लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.
गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना एअर फोन कानात लावल्याने कान दुखीचा आजार झाला होता, तर सतत संगणक, लॅपटॉप व मोबाईलवर पाहत असल्याने डोळ्यांची नजर कमी होत आहे. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
मुलांना व्यायामासाठी परावृत्त करावे, यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तेल, तूप, बटाटे, भजी, केळी, भात, मैद्याच्या पदार्थाचा समावेश जेवणात अजिबात नकोच. विविध प्रकारची फळे, पन्ह, कोकम सरबत दिवसातून चार वेळा दिले तरी चालेल, जंक फूड देऊ नये. – वृषाली वझे, आहार तज्ज्ञ, मनपा रुग्णालय, वाशी
विद्यार्थ्यांनी एअरफोनचा वापर करू नये. संगणक, लॅपटॉप, मोबाईलला छोटे स्पीकर लावून छोट्या आवाजात ऐकावे, त्यामुळे कानाच्या समस्या निर्माण होणार नाहीत. – डॉ. योगेश नारखेडे, कान, नाक, घसा तज्ज्ञ, मनपा रुग्णालय, वाशी
(PRAHAAR)