मुंबई : मुंबईला दोन दिवस पावसानं झोडपलं… मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचलेलं पाहायला मिळाल, तर अनेक ठिकाणची झाडंही पडली. पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफीक जॅमचीही समस्या उद्भवली होती. पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केला होता. मुंबईत काल चार तासांत विक्रमी ३०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यावरून मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आय. एस, चहल यांनी एवढा पाऊस पडल्यावर मुंबई काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच, असा दावा केला.
पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ भिंत खचून ५० वृक्ष उन्मळून पडले. त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त आले होते. यावेळी ते म्हणाले,”गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच. काल मुंबईतील काही भागांत वादळच आले होते. काल मुंबईत १०१ किलोमीटरच्या वेगानं वारे वाहत होते. दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता. कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला. २६ जुलैचा महापूर आला होता, तेव्हा मी मुंबईत होतो. पण त्यावेळीही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता.”
पावसामुळे रेल्वे रुळांवरही पाणी साचले होते आणि त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणारे अनेक प्रवाशी रेल्वेतच अडकले होते. रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. पालिकेनं त्यांची राहण्याची सोय पालिका शाळांमध्ये केली होती. पालिकेकडून त्यांना जेवणही दिलं गेलं, ही माहितीही आयुक्तांनी दिली.
मेट्रोवर खापर फोडता येणार नाही
आयुक्तांनी सांगितले की,”साधारणपणे ६५ मिमी पाऊस पडला तरी अतिवृष्टी झाली असं मानलं जातं. पण काल ३०० मिमी पाऊस पडला. एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातली कोणतंही शहर तुंबणारच. साधारण पाऊस पडून पाणी तुंबले असते तर मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्याचं आपण बोलू शकलो असतो. पण विक्रमी पाऊस पडल्याने मेट्रोवर खापर फोडता येणार नाही.”