मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शुक्रवारी कोरोनाचे २९४० नवे रुग्ण आढळले असताना व हा आजवरचा उच्चांक ठरला असताना मुंबईतील आकडेवारीही चिंतेत भर घालणारी आहे. राज्यातील २९४० पैकी तब्बल १७५१ रुग्ण एकट्या मुंबईतील असून २४ तासांतील हा सर्वाधिक आकडा आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आणखी २७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोना बळींचा एकूण आकडा आता ९०९ इतका झाला आहे. राज्याचा विचार केल्यास राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १५१७ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईतील मृतांच्या आजच्या आकडेवारीवर नजर मारल्यास २७ पैकी २२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात १८ पुरुष व ९ महिला रुग्णांचा समावेश होता. मृतांपैकी एकजण ४० वर्षांखालील, १३ रुग्ण ६० वर्षावरील तर उर्वरित १३ रुग्ण ४० ते ६० वर्षे या वयोगटातील होते.
मुंबई महापालिका हद्दीत शुक्रवारी एकाच दिवशी १७५१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यात १४७५ रुग्ण आज दिवसभरात आढळले असून १७ मे रोजीचे विविध प्रयोगशाळांमधील अहवाल शुक्रवारी प्राप्त होऊन त्यात २७६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रुग्णसंख्या धरून मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा २७ हजार ६८ इतका झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शुक्रवारी वाढले आहे. गेल्या २४ तासांत मुंबई पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांत दाखल ३२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईत ७०८० रुग्णांनी कोरोना विरुद्धची जीवघेणी लढाई जिंकली आहे. दरम्यान, कोरोना सदृष्य लक्षणे असलेले आणखी ७८० रुग्ण आज विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या आता २३ हजार २६४ इतकी झाली आहे.
(PRAHAAR)