उर्मिला मातोंडकरचे काँग्रेस पदाधिका-यांवर गंभीर आरोप
मुंबई : लोकसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरूच आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे एक जुने पत्र समोर आले असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत. ‘कार्यकर्त्यांशी समन्वय राखण्यात काँग्रेस पदाधिकारयांचे अपयश’ असा नाराजीचा सूर असलेले पत्र उर्मिलांनी मिलिंद देवरांना लिहीले आहे.
उर्मिला यांनी तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना एक पत्र लिहीले असून यामध्ये त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, त्याचा कामावर पडणारा एकंदरीत प्रभाव याबद्दल खंत व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी म्हणजेच १६ मे रोजी उर्मिला यांनी मिलिंद देवरांना पत्र लिहीले होते. काँग्रेसने उर्मिलांना लोकसभा निवडणूकीत उत्तर मुंबई मतदार संघातून उभे केले होते. या मतदार संघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप उर्मिलांनी पत्राद्वारे केला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी निवडणूकीदरम्यान व्यवस्थित कामे केली नाहीत, शिवाय चुकीची रणनीती आखल्याचंही उर्मिलाने या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जाणीवपूर्वक जुने पत्र समोर आणून उर्मिला राजकारण करत असल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला आहे. तर दूसरीकडे निरूपम यांनी देवरांवरही निशाणा साधला आहे. मुंबई काँग्रेसचे कामकाज चालवण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करावी असे देवरांनी सूचवले होते. त्यानंतर संजय निरूपम यांनी देवरांवर ट्विटरद्वारे निशाणा साधत त्यांच्या सूचनेला विरोध केला. एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणे योग्य नसल्याचे निरूपम यांनी म्हटले आहे. (PRAHAAR)