नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष २०२०-२१ साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक नाशकात पार पडली. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. आता आंदोलन गनिमी काव्याने करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये पडणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीनंतर राज्य सरकारला ३ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. भूमिका स्पष्ट करा नाहीतर आंदोलन अटळ आहे अशी आक्रमक भूमिका क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना दुसरीकडे आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
सरकारकडून विश्वासघात : आ. नितेश राणे
भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट सरकारला इशारा देत म्हटले आहे की, या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला. आज आमच्या समाजाच्े भविष्य अंधारात गेले. कुठल्या तोंडाने या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचे आणि कशासाठी? आता मूक मोर्चे नाहीच. आता संघर्ष अटळ आहे असा इशारा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
याची जबर किंमत मोजावी लागेल; संभाजीराजे यांचा इशारा
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
निकालानंतर संभाजीराजे भोसले यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. ‘आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वत:च्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अपेक्षा आहे,’ असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. (PRAHAAR)