मुंबई : मुंबई, ठाणे, नागपूर ही शहरे वगळता इतर महाराष्ट्रात देखील अंमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर जर रोख लावायचा असेल तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टामार्फत विक्री होत असल्याची लक्षवेधी आज विधानसभेत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा यांनी उपस्थित केली. अंमली पदार्थांमुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे ११वी, १२वीला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू तसेच मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबईत पाच स्वंतत्र कक्ष काम करत असल्याचेही रणजित पाटील यांनी सांगितले. या कक्षांना मनुष्यबळ आणि निधीची आवश्यकता आहे, तो निधी वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही रणजित पाटील म्हणाले.
भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अंमली पदार्थांची ‘खिशातली दुकाने’ याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर बोलताना अजित पवार यांनी जनरल स्टोअर्सचे परवाने रद्द करून काहीही होणार नाही ही खिशातली दुकाने बंद करा अशी मागणीही केली. यावर उत्तर देताना रणजीत पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला आता १० ऐवजी २० वर्षांची शिक्षा दिली जात आहे. पुर्वी मॅजिस्ट्रेटसमोर या केसेस चालत होत्या आता जलदगतीने चालाव्यात यासाठी त्या सेशन कोर्टात चालविण्यात येत आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये साध्या वेषात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल अशीही माहिती त्यांनी दिली.
या लक्षवेधी दरम्यान अजित पवार यांच्यासह भाजपच्या आमदार मनिषा चौधरी, काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी प्रश्न विचारले.
(PRAHAAR)