मुंबई : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावर भरवसा ठेऊन मध्य रेल्वेने कमी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला असून सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस खूप होणार आणि रुळांवर पाणी साचणार असा अंदाज घेत मध्य रेल्वेने आज बुधवार असूनही रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल वाहतूक सुरू केली. मात्र पहाटेपासून पावसाने चक्क दडी मारली आणि लोकलविलंबाचा फटका कामावर जाणा-या चाकरमान्यांना सकाळपासूनच बसायला सुरुवात झाली. रविवारी प्रवाशांची संख्या कमी असतानाही लोकलमध्ये रेटारेटीचा अनुभव मुंबईकरांना येत असतो. अशात आज मुंबईकरांचा नेहमीचाच धावपळीचा दिवस आणि त्यात लोकलची संख्या कमी, यामुळे मुंबई, ठाण्यातील लोकल स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. काल सुटी असल्याने आज कामावर वेळेवर पोहचणे आवश्यक असल्याने प्रत्येकजण घाईत होता. मात्र रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर दुपारपासून मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक रद्द करुन नियमित वेळापत्रकानुसार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कामावर वेळेवर पोहचण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात सकाळी तुफान गर्दी झाली. तर ठाण्यात चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या. संतप्त प्रवाशांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी केलेल्या दगडफेकीत अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर मुंब्रा आणि कळवादरम्यान तीन प्रवासी लोकलमधूनल खाली पडल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.
As announced by CR, and looking at the forecast, suburban services now running as normal weekday schedule.
CR appreciate the support extended by commuters.— Central Railway (@Central_Railway) July 3, 2019
Kindly note:
Suburban services of Mumbai Division will run as per Sunday timetable on 3.7.2019. pic.twitter.com/zI9dfmtTdn— Central Railway (@Central_Railway) July 2, 2019
(PRAHAAR)