मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहचला आहे. तर, २१ जणांची सुटका करण्यात बचावपथकांना यश मिळाले आहे. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत, तसेच सर्व वैद्यकीय खर्च सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईतील डोंगरी भागात १०० वर्षे जुनी केसरबाई नावाची चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली होती. यात ४० ते ४५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ढिगा-याखाली इमारतीतीलच लोक नाही तर तेथील रस्त्यावरील विक्रेते व ये-जा करणारेही अडकल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सात पुरूष, चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत २१ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. आणखी काही जण ढिगा-याखाली असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, मुंबई पोलिस व अग्निशमन दल आदींच्या मदतीने बचावकार्य अद्याप सुरूच आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
डोंगरी इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आणि संबंधित अधिकारी राहणार उपस्थित राहणार आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत कुठल्या प्राधिकरणाची होती याची जबाबदारी निश्चित करण्यासोबतच मुंबईतील अतिधोकादायक ५०० इमारतींबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. केसरबाई इमारतीची जबाबदारी घेण्यावरून महापालिका आणि म्हाडा यांची सध्या टोलवाटोलवी सुरू आहे.
मुंबईतील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. दुर्घटना स्थळी बचाव व मदत कार्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्यासोबत योग्य समन्वय राखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले होते.
(PRAHAAR)