नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना मोठा झटका दिला आहे. एरिक्सन इंडियानं केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान अनिल अंबानींना 550 कोटी रुपयांची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. एरिक्सन इंडियाने 550 कोटी रुपये रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे बाकी असल्याचे याचिकेत म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करत एरिक्सन इंडियाच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना एरिक्सनचे पैसे व्याजासकट देण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनच्या अनिल अंबानींसह दोन संचालकांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने अनिल अंबानी आणि त्यांच्या दोन संचालकांना चार आठवड्यांच्या आत एरिक्सनचे 453 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. तसेच दिलेल्या मुदतीच्या आत अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीच्या ‘त्या’ दोन संचालकांनी चार आठवड्यांच्या आत पैसे न भरल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. टेलिकॉम डिव्हाइस तयार करणारी कंपनी एरिक्सननं अनिल अंबानींबरोबरच कंपनीचे संचालक सतीश सेठ, रिलायन्स इन्फ्राटेलचे अध्यक्ष छाया विरानी आणि एसबीआयचे अध्यक्षांविरोधात न्यायालयात तीन अवमानता याचिका दाखल केल्या होत्या. तत्पूर्वी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या पीठाने 13 फेब्रुवारीला सुनावणी केली होती, त्यावेळी त्यांनी निर्णय राखून ठेवला होता. रिलायन्स ग्रुपकडे राफेल करारासाठी पैसे आहेत, परंतु ते आमचे 550 कोटी रुपये देऊ शकत नाही, असा आरोप एरिक्सन इंडियाने केला होता. परंतु रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम)ची रिलायन्स जिओशी संपत्तीसंदर्भात असलेली बोलणी फिस्कटल्याने एरिक्सनचे पैसे चुकवू न शकल्याची खंतही अनिल अंबानींनी बोलून दाखवली आहे.
Supreme Court says Anil Ambani & 2 directors have to pay Rs 453 Cr to Ericsson India within 4 weeks & if they fail to pay the amount, three months’ jail term will follow. SC also imposed a fine of Rs 1 cr each on them, if not deposited within a month, 1-month jail will be awarded https://t.co/5PG6OsD2j3
— ANI (@ANI) February 20, 2019
काय आहे एरिक्सनचा आरोप?
रिलायन्सकडे राफेल विमान करारात गुंतवण्यास पैसे आहेत, मात्र आमचे थकीत 550 कोटी देण्यास पैसे नाहीत, असा आरोप एरिक्सन इंडियाने केला. मात्र अनिल अंबानींच्या रिलायन्सने हा आरोप फेटाळला. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज कोर्टाने 4 आठवड्यात पैसे देण्यास बजावले आहे.
अनिल अंबानींच्या कंपनीचा दावा काय?
अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या दाव्यानुसार, “मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओसोबत भागांच्या विक्री व्यवहारात, त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली. मात्र एरिक्सन इंडियाचे पैसे परत करण्यासाठी आमची कंपनी शक्य ते सर्व प्रयत्न केला, मात्र अद्याप यश आले नाही”
(PRAHAAR)