मुंबई : ‘सरहद पर तनाव है क्या, पता करो कही चुनाव है क्या…’ शायर राहत इंदोरी यांची ही शायरी. पुलवामा येथे झालेला हल्ला आणि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका…सध्याची स्थिती राहत इंदोरी यांच्या शायरीमधून दिसून येते. अडीच हजार जवानांचा ताफा रस्त्यावरून जात असताना त्या जवानांवर आरडीएक्सने भरलेली एक खासगी गाडी धडक देत मुळात हल्ला करतेच कसा? गुप्तचर यंत्रणेने सतर्कतेचा इशारा देऊनही योग्य ती पावले का उचलली गेली नाहीत? निवडणुकांसाठी आमच्या सैनिकांचा बळी घेतला गेला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करणारा एक व्हीडिओ मनसेच्या योगेश चिले या पदाधिका-याने बनवला आहे.
निवडणुका येतील जातील, देशावर जेव्हा असा भ्याड हल्ला होतो तेव्हा राजकीय नेत्यांना संताप यायला हवा. जे संतापत नाही ते राजकीय नेते कसले? कशाला हव्या त्या निवडणुका? निवडणुका येतील जातील, पण आमच्या सैनिकांचा गेलेला जीव परत येणार नाही. तुमच्या निवडणुकांसाठी आमच्या सैनिकांचा बळी घेऊ नका, अशी खंत चिले यांनी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांना जोपर्यंत कुणी ठणकावून हे विचारत नाही तोपर्यंत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे हल्ले होतच राहणार, असेही ते पुढे म्हणाले.
पुलवामाचा हल्ला असो किंवा इतर कोणता हल्ला, असे हल्ले झाले की यावरून राजकारण करू नका, कसलीही चर्चा करू नका असा सूर सर्वत्र उमटायला लागतो. मात्र पुलवामा हल्ला कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, ज्या ४० जवानांनी त्यांचे प्राण गमावले ते कुणामुळे झाले, याचा जाब विचारायला नको का? असे म्हणत राजकारण करू नका म्हणणारे कसे राजकारण करत आहेत, जवान शहीद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ, भाजपा आयटी सेल इतर कामांमध्ये व्यस्त होते. यावरूनच भाजपची असंवेदनशीलता दिसून येते असे म्हणत चिले यांनी भाजपवर टीका केली.
(PRAHAAR)