मुंबई: नवी मुंबईचे शिवाजी महाराज नगर, ठाण्याचे जिजाऊनगर तर पुण्याचे संभाजीनगर असे नामकरण करावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मानखुर्दचे आमदार अबू आझमी यांनी केली.
अबू आझमी यांनी बुधवारी (ता. २८) विधानसभेत या तीन शहरांचे नाव बदलून महाराष्ट्राचा स्वाभिमान व आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह जिजामाता व संभाजीराजे यांची नावे देण्याची मागणी केली. सध्या देशभरातील विविध शहरांची नावे बदलली जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावे अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. त्या पार्श्वभूमीवर अबू आझमी यांनी विधानसभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत ही नविन मागणी करून धमाल उडवून दिली.
आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मागणी करताना म्हटले की, नवी मुंबई शहराला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव द्यावे. तसेच ठाणे शहराचे जिजाऊनगर असे नामकरण करावे. तर त्यांचे शूरवीर पुत्र संभाजीराजे यांचे पुणे शहराला नाव देऊन संभाजीनगर असे करावे.
(PRAHAAR)